मुंबई : राज्यसभेवर जाण्याच्या चर्चांना मंत्री छगन भुजबळ यांनी पूर्णविराम दिला आहे. राज्यात ज्येष्ठ मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यसभेसाठी आग्रह धरणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या जागेबाबत पक्षात अद्याप कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नसून पक्ष नेतृत्व जो निर्णय घेईल तो अंतिम असेल, अशी भूमिका त्यांनी मांडली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे या जागेवर कोणाची निवड होणार याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेससमोर मुंबई प्रदेशाध्यक्षपदाची निवडही मोठे आव्हान ठरत आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान समीर भुजबळ यांनी राजीनामा दिल्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून हे पद रिक्त आहे. त्यामुळे राज्यसभा आणि मुंबई प्रदेशाध्यक्ष या दोन्ही महत्त्वाच्या नियुक्त्या एकाच वेळी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या राज्यसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे Praful Patel, Parth Pawar आणि नितीन पाटील असे तीन खासदार आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात विविध पदांवर नियुक्त्यांबाबत राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी आनंद परांजपे, भुजबळ कुटुंबीय, मलिक कुटुंबीय, अविनाश आदिक आणि विक्रम काकडे यांची नावे चर्चेत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र प्रश्न केवळ राज्यसभेपुरता मर्यादित नसून पक्षातील अनेक महत्त्वाची पदेही अद्याप रिक्त आहेत. युवक प्रदेशाध्यक्षपद गेल्या दहा महिन्यांपासून रिक्त आहे, तर रूपाली चाकाणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर महिला आयोग आणि महिला प्रदेशाध्यक्ष पदासाठीही नियुक्ती झालेली नाही. तसेच समीर भुजबळ यांच्या राजीनाम्यानंतर मुंबई अध्यक्षपदावरही कोणाची निवड झालेली नाही. त्यामुळे या सर्व पदांसाठी इच्छुकांकडून पक्ष नेतृत्वाकडे जोरदार लॉबिंग सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. आता पक्ष नेतृत्व राज्यसभा, मुंबई अध्यक्षपद आणि इतर संघटनात्मक बदलांसाठी कोणत्या नेत्यांवर विश्वास दाखवते, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.






