पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांची अंतरिम उत्तरसूची जाहीर करण्यात आली असून, त्यावरील आक्षेप आणि हरकती नोंदवण्यासाठी विद्यार्थ्यांना, पालकांना आणि शिक्षकांना १४ मेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. चौथी आणि सातवीच्या परीक्षेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली उत्तरसूची इयत्तानिहाय आणि पेपरनिहाय संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. उत्तरसूचीबाबत काही त्रुटी किंवा हरकती असल्यास त्या केवळ ऑनलाइन पद्धतीनेच नोंदवाव्या लागणार आहेत. पालकांसाठी स्वतंत्र ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, शाळांसाठी त्यांच्या लॉगीनद्वारे आक्षेप नोंदवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, १४ मेनंतर कोणत्याही प्रकारचे आक्षेप स्वीकारले जाणार नाहीत. तसेच ऑनलाइन व्यतिरिक्त इतर माध्यमातून पाठवलेल्या निवेदनांचाही विचार केला जाणार नाही. प्राप्त हरकतींवर विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेतल्यानंतर अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या अर्जातील नाव, आडनाव, आई-वडिलांचे नाव, जन्मतारीख, लिंग, जात प्रवर्ग, शाळेचा अभ्यासक्रम आणि शाळेचे क्षेत्र यामध्ये दुरुस्ती करण्यासाठीही १४ मेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. संबंधित दुरुस्ती अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहेत. यंदा शिक्षण विभागाने पाचवी आणि आठवीसोबतच चौथी आणि सातवीसाठीही शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार २६ एप्रिल रोजी राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये ही परीक्षा पार पडली. चौथी आणि सातवी मिळून एकूण ११ लाख ५५ हजार ६९५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी चौथीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या ६ लाख ९४ हजार ५९७ विद्यार्थ्यांपैकी ६ लाख ५७ हजार ७७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर सातवीच्या ४ लाख ६२ हजार १३८ विद्यार्थ्यांपैकी ४ लाख ३३ हजार ८५७ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. परीक्षेनंतर विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचे उत्तरसूचीकडे लक्ष लागले होते. परिषदेकडून अधिक माहिती अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.







