कोकण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) आज, २ मे २०२६ रोजी बारावी (HSC) परीक्षेचा निकाल जाहीर केला. यंदाही कोकण विभागाने उत्कृष्ट कामगिरी करत सलग १५व्या वर्षी राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. कोकण विभागाचा निकाल ९४.१४ टक्के लागला असून राज्यातील सर्व नऊ विभागांमध्ये तो सर्वाधिक ठरला आहे. राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के इतका लागला असून विद्यार्थ्यांनी समाधानकारक यश मिळवले आहे. यंदाच्या निकालात मुलींनी पुन्हा एकदा मुलांपेक्षा सरस कामगिरी केली आहे. मुलींचा निकाल ९३.१५ टक्के लागला असून मुलांचा निकाल ८६.८० टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात मुलींचे वर्चस्व कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शाखानिहाय निकालात विज्ञान शाखेने सर्वाधिक चमकदार कामगिरी करत ९६.४४ टक्के निकालाची नोंद केली आहे. विभागीय क्रमवारीत कोकणनंतर पुणे विभागाचा निकाल ९१.२५ टक्के, नाशिक विभागाचा ९०.७२ टक्के आणि मुंबई विभागाचा ९०.०८ टक्के लागला आहे. तर लातूर विभागाचा निकाल ८४.१४ टक्के लागून तो राज्यातील सर्वात कमी निकाल ठरला आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना आपला निकाल अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी सीट नंबर आणि आईचे नाव टाकणे आवश्यक आहे. निकाल पाहण्यासाठी mahresult.nic.in, hscresult.mkcl.org आणि mahahsscboard.in या संकेतस्थळांचा वापर करता येणार आहे.






