नवी दिल्ली : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांची सांगता होताच देशातील व्यावसायिक एलपीजी ग्राहकांना महागाईचा मोठा धक्का बसला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी १ मे २०२६ पासून १९ किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत तब्बल ९९३ रुपयांची विक्रमी वाढ केली आहे. मात्र सर्वसामान्य नागरिकांना काहीसा दिलासा देत घरगुती वापराच्या १४.२ किलो एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावरील भू-राजकीय तणाव, विशेषतः इस्रायल-इराण संघर्ष आणि ‘हॉर्मुझ सामुद्रधुनी’ मार्गावरील अडथळ्यांमुळे जागतिक ऊर्जा पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. जगातील मोठ्या प्रमाणातील तेल आणि नैसर्गिक वायूची वाहतूक या मार्गाने होत असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात इंधन दर वाढले असून त्याचा थेट परिणाम व्यावसायिक गॅसच्या किमतींवर झाला आहे. मार्च आणि एप्रिलमधील वाढीनंतर मे महिन्यातील ही सलग तिसरी मोठी दरवाढ ठरली आहे.
Indian Oil Corporation यांनी जाहीर केलेल्या नव्या दरानुसार, दिल्लीत १९ किलोचा व्यावसायिक सिलिंडर २,०७८.५० रुपयांवरून थेट ३,०७१.५० रुपयांवर पोहोचला आहे. मुंबई, पुणे, नाशिकसह दिल्ली, चेन्नई आणि कोलकाता या प्रमुख शहरांमध्येही हे नवीन दर लागू करण्यात आले आहेत. या अभूतपूर्व वाढीमुळे हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ, केटरिंग व्यवसाय तसेच छोटे खाद्यपदार्थ विक्रेते आर्थिक संकटात सापडले आहेत. स्वयंपाकाचा खर्च वाढल्यामुळे आगामी काळात खाद्यपदार्थांचे दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आधीच गॅस पुरवठ्यातील अडचणी आणि वाढत्या खर्चामुळे त्रस्त असलेल्या लघुउद्योजकांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे. या वाढीव खर्चाचा बोजा ग्राहकांवर टाकण्याशिवाय पर्याय नसल्याची भावना हॉटेल व्यावसायिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, अचानक झालेल्या या दरवाढीमुळे व्यापारी आणि हॉटेल संघटनांनी केंद्र सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.







