रत्नागिरी : राज्यातील एसटी प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेत राज्य सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कोल्हापूर येथे महत्त्वपूर्ण घोषणा करत येत्या १ जूनपासून राज्यातील सर्व बस स्थानकांवरील स्वच्छतागृह प्रवाशांसाठी पूर्णपणे मोफत करण्यात येणार असल्याचे सांगितले.
या निर्णयामुळे दररोज लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे. यासोबतच एसटी महामंडळाच्या ताफ्यात तब्बल ८ हजार नव्या बसची भर टाकण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला आहे. या बस टप्प्याटप्प्याने प्रत्येक जिल्ह्यात दाखल होणार असून, त्यामुळे एसटी सेवा अधिक सक्षम आणि विस्तारित होणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे बस स्थानकांवरील कॅन्टीनमध्ये ३० रुपयांत चहा-नाश्ता देणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमाचे पालन न केल्यास संबंधित कॅन्टीनवर कडक कारवाई केली जाणार असल्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकातील पाहणीदरम्यान स्वच्छता समाधानकारक आढळली. मात्र, दरफलकांवर चिकटपट्टी लावून किंमती लपवण्याचा प्रकार समोर आल्यानंतर मंत्री प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच सुनावलं. त्यानंतर कॅन्टीनमधील नाश्त्याच्या दरांबाबत पारदर्शकता राखण्याचे आणि प्रवाशांना परवडणाऱ्या दरात सुविधा देण्याचे निर्देश देण्यात आले. या सर्व निर्णयांमुळे एसटी प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी, किफायतशीर आणि सोयीस्कर होणार असल्याचे चित्र दिसत आहे.







