पुणे : पुणे जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराबाबत जिल्हा प्रशासनाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मंदिराच्या परिसरात सुरू असलेली विकासकामे जलदगतीने पूर्ण करण्यासाठी आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी ९ एप्रिल ते ३१ मे २०२६ या कालावधीत मंदिर सर्वसामान्यांसाठी तात्पुरते बंद ठेवण्यात येणार आहे.
२०२७ मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. २०२५ च्या प्रयागराज महाकुंभमेळ्यातील अनुभवावरून धडा घेत, प्रशासनाने भीमाशंकर येथे पायाभूत सुविधांचे काम हाती घेतले आहे. पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले की, जूनमध्ये मान्सून सुरू होण्यापूर्वी ही कामे पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे, म्हणूनच हा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिराच्या परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरू आहे. जुना सभामंडप भाविकांच्या गर्दीसाठी अपुरा पडत असल्याने तो पूर्णपणे पाडून आता भव्य सभामंडप उभारला जात आहे. याचे ७५ टक्के काम पूर्ण झाले असून सध्या घुमटाचे काम सुरू आहे. मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांच्या मार्गाचे कामही प्रगतीपथावर असल्याने हा रस्ता सध्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद आहे. परिसरात मोठमोठे दगड, बांधकाम साहित्य आणि अवजड यंत्रसामग्री असल्याने भाविकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. भीमाशंकर हा अतिवृष्टीचा भाग म्हणून ओळखला जातो. जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता असल्याने, पावसाळा सुरू होण्यापूर्वी मुख्य बांधकाम संपवण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. या कालावधीत स्थानिक नागरिक आणि भाविकांनी जिल्हा प्रशासन, पोलीस आणि मंदिर ट्रस्टला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डुडी यांनी केले आहे.







