वसई : मुंबई-अहमदाबाददरम्यान चालवण्यात येणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये विरार येथे एक स्थानक उभारण्यात येणार आहे. या स्थानकाचा आणि परिसराचा विकास विविध टप्प्यांत करण्यात येणार असून, तो शाश्वत पद्धतीने केला जाणार आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी ‘व्हेलो सिटी’ संकल्पना राबवण्यात येणार असून, पर्यावरणपूरक वाहतुकीचे साधन म्हणून सायकलला प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे म्हणजेच बुलेट ट्रेन वसई तालुक्यातूनही जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत राज्यात एकूण चार स्थानके प्रस्तावित असून त्यात बीकेसी, ठाणे, विरार आणि बोईसर यांचा समावेश आहे. यानुसार वसई-विरार परिसरात उभारण्यात येणारे विरार स्थानक नालासोपारा पूर्वेच्या पेल्हार येथील वालईपाडा येथे प्रस्तावित आहे. हा प्रकल्प जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्था (जायका) यांच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. विरार स्थानकासह परिसराचा विकास सुमारे ४६५ हेक्टर क्षेत्रात करण्यात येणार आहे. या परिसरात नागरी वसाहती, तसेच व्यावसायिक केंद्रांचा विकास होणार असून हे काम तीन टप्प्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात स्थानक उभारणी, दुसऱ्या टप्प्यात स्थानिक क्षेत्राचा विकास, तर तिसऱ्या टप्प्यात मध्यम ते कमी घनतेचा दीर्घकालीन विकास स्थानक सुरू झाल्यानंतर पाच वर्षांत पूर्ण केला जाणार आहे. या प्रकल्पा अंतर्गत विरार स्थानक परिसराचा विकास ‘व्हेलो सिटी’ या संकल्पनेनुसार करण्यात येणार आहे. या संकल्पनेनुसार, विरार स्थानक केवळ प्रादेशिक वाहतूक केंद्र न राहता शाश्वत, सायकल-स्नेही आणि पर्यावरणपूरक शहरी केंद्राचा मुख्य भाग म्हणून विकसित होणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.







