मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरात प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला आहे. राज्यातील जवळपास दोन कोटींपेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. राज्य सरकारकडून अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना लाडकी बहीण योजना अंतर्गत आर्थिक मदत केली जाते. या योजने अंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते. या योजनेसाठी काही निकष ठेवण्यात आली आहे. तसेच आता निकषांची अंमलबजावणी कठोरपणे केली जात आहे. राज्य सरकारकडून लाभार्थी महिलांना ई-केवायसी करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. या ई-केवायसीसाठी तारीखही वाढवण्यात आली होती. आता ई-केवायसीची मुदत संपली आहे. दरम्यान, याच ई-केवायसीबद्दल महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत महत्त्वाची माहिती दिली आहे. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबाबत महत्वाची सूचना! महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी पर्यंत e-KYC करण्याची मुदत देण्यात आली होती. तथापि, काही कारणास्तव e-KYC करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. म्हणूनच, योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी (Physical Verification) करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत”, अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. आदिती तटकरे यांनी फेसबुवरही याबाबतची माहिती दिली आहे. त्यांच्या पोस्टवर अनेकांकडून प्रतिक्रिया दिली जात आहे. अनेकांनी ई-केवायसीची मुदत आणखी वाढवण्याची विनंती केली आहे. काही महिलांची ई-केवायसी करताना ओटीपी आला नाही त्यामुळे ई-केवायसी पूर्ण होऊ शकली नाही, अशा महिलांसाठी ई-केवायसीची तारीख वाढवण्यात यावी, अशी विनंती एका युजरने आदिती तटकरे यांच्या फेसबुक पोस्टवर केली आहे. आता या कमेंटचा विचार करुन आदिती तटकरे खरंच अशा महिलांसाठी काही निर्णय घेतात का? ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी राहिली आहे त्यांच्यासाठी मुदत वाढवण्याचा निर्णय घेतात का? ते पाहणं आता महत्त्वाची आहे.







