ठाणे : नवी मुंबईतील रेल्वेवरील पूल लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार असून या पूलामुळे पनवेल, नवीमुंबईच्या नागरिकांचा ठाणे आणि मुंबईकडे प्रवास सुखकर होणार आहे. मार्च २०२६ अखेरपर्यंत या पुलाचे काम पूर्ण होणार असल्याची चिन्हे आहेत. गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या या पुलाच्या कामामुळे त्रस्त झालेल्या उरणकरांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
जेएनपीए बंदरातून देशभरात कंटेनर मालवाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. या वाहतुकीसाठी रेल्वे मार्गावर दुहेरी कंटेनर वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी पुलाची उंची वाढवणं आवश्यक होते. म्हणून उरण पूर्व विभागाला जोडणारा गव्हाणफाटा-चिरनेर दरम्यानच्या मालगाडी रेल्वे मार्गावरील जुना पूल तीन वर्षांपूर्वी पाडण्यात आला होता. रेल्वे पूल बंद झाल्याने उरण तालुक्यातील जांभूळपाडा, वेश्वी आणि दिघोडे या गावातील एसटी बस सेवाही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना रिक्षा आणि इतर वाहनांवर अवलंबून राहावे लागत आहे. याचा आर्थिक फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. परंतू, विविध तांत्रिक अडचणी आणि कामातील अडथळ्यांमुळे हे काम रखडले होते. रखडलेल्या या कामामुळे नागरिक प्रचंड त्रस्त झाले होते. अखेर या रखडलेल्या कामाला हिरवा कंदील मिळाला असून काम पुन्हा सुरु करण्यात आले असून येत्या मार्च २०२६ अखेर पर्यंत हा पुला नागरिकांच्या सेवेत सुरु होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.







