वृत्तसंस्था : भारतीय संघाचा (Team India) धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यर दुखापतीतून पूर्णपणे बरा होऊन पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. ऑस्ट्रेलियातील एकदिवसीय मालिकेदरम्यान श्रेयस अय्यरला दुखापत झाली होती. त्याने झेल घेण्यासाठी उडी मारली असताना त्याच्या स्नायूंना दुखापत झाली होती. त्यामुळे अंतर्गत रक्तस्त्रावही झाला होता. यामुळे तो दोन महिने खेळापासून दूर होता. पण आता तो पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे.
श्रेयस अय्यर पूर्णपणे बरा झाला आहे. श्रेयस अय्यर विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईकडून पुढील सामना खेळेल. या सामन्यासाठी त्याला बीसीसीआयकडून परवानगी मिळाली आहे. हा सामना ६ जानेवारीला खेळला जाणार आहे. अय्यरने बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये १० दिवस घालवले. तिथे त्याने सर्व चाचण्या उत्तीर्ण केल्या. श्रेयस अय्यरने २ जानेवारी रोजी सराव सामना खेळला, तेव्हा त्याने कोणत्याही वेदनाशिवाय फलंदाजी केली. त्याने इतर सरावांमध्येही भाग घेतला. सामन्यापूर्वी आणि नंतर तो पूर्णपणे वेदनामुक्त असल्याचे दिसून आले.







