मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पाचवी, आठवी या इयत्तांसाठी घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या विद्यार्थी नोंदणीत यंदा वाढ झाली आहे. प्रामुख्याने पाचवीच्या नोंदणीत लक्षणीय वाढ झाली असून, विद्यार्थी नोंदणी वाढण्यामागे पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांचे शेवटचे वर्ष, शिष्यवृत्तीची वाढलेली रक्कम अशी काही कारणे तज्ज्ञांकडून नोंदवण्यात आली. परीक्षा परिषदेच्या आकडेवारीनुसार, २०२४मध्ये पाचवीच्या परीक्षेसाठी ५ लाख १० हजार ६६६, २०२५मध्ये ५ लाख ६६ हजार ३६८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर यंदा विद्यार्थी नोंदणीत लक्षणीय वाढ होऊन ६ लाख ४९ हजार ८७५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर आठवीच्या परीक्षेसाठी २०२४मध्ये ३ लाख ८१ हजार ५८५, २०२५मध्ये ३ लाख ७८ हजार ९५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यंदा ३ लाख ८२ हजार ४९५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. २२ फेब्रुवारीला राज्यभरात शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे.
राज्यातील गुणवान विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, स्पर्धात्मकतेसाठी प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात येते. पूर्वी ही परीक्षा चौथी आणि सातवी या इयत्तांसाठी घेतली जात होती. मात्र, शिक्षण हक्क कायद्यातील (आरटीई) तरतुदी लक्षात घेऊन २०१६-१७पासून ही परीक्षा पाचवी आणि आठवी या वर्गांसाठी लागू करण्यात आली. पाचवी आणि आठवीला शिष्यवृत्ती परीक्षा लागू केल्यापासून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर, शिष्यवृत्ती परीक्षा पूर्वीप्रमाणेच चौथी आणि सातवी या वर्गांसाठी आयोजित करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे यंदा पाचवी, आठवीसाठी होणारी शिष्यवृत्ती परीक्षा अखेरची ठरणार आहे. तसेच पाचवी, आठवीच्या परीक्षेनंतर चौथी आणि सातवीसाठीही स्वतंत्रपणे परीक्षा घेतली जाणार आहे.







