मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी एक मोठी घोषणा केली आहे. सध्या अस्तित्वात असलेली टोल कलेक्शन सिस्टिम एक वर्षांच्या आत कालबाह्य होणार असून त्याजागी एक नवीन इलेक्ट्रॉनिक सिस्टम आणण्यात येणार आहे. यामुळं महामार्गावर आता ब्रेक न घेता वाहनचालकांना प्रवास करता येणार आहे. लोकसभेत प्रश्न-उत्तराच्या तासात नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली आहे.
सध्याची टोल कलेक्शन सिस्टिम ही एका वर्षात टप्याटप्याने बंद केली जाणार आहे. त्याजागी इलेक्ट्रॉनिक प्रणाली आणली जाईल. ही नवीन प्रणाली १० ठिकाणी सुरू करण्यात आली आहे आणि एका वर्षाच्या आत देशभरात तिचा विस्तार केला जाणार आहे. तसंच, देशभरात सध्या १० लाख कोटी रुपयांचे ४,५०० महामार्ग प्रकल्प सुरू असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन (NETC) प्रोगॅम राबवला आहे. इलेक्ट्रॉनिक टोल पेमेंटसाठी हा एक एकीकृत प्लॅटफॉर्म आहे. जेणेकरुन भारतात महामार्गावर टोल कलेक्शन करण्याची प्रक्रिया सोप्पी होईल. NETCचा महत्त्वाचा भाग FASTag असून हे गाडीच्या विंडस्क्रीनवर लावण्यात आलेला एक रेडिओ फ्रीक्वेन्सी आयडेंटिफिकेशन बेस्ड डिव्हाइस आहे. टोल बुथवर थांबल्यानंतर युजरच्या अकाउंटमधून आपोआप टोलची रक्कम वजा होते.







