मुंबई : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) २ कोटींहून अधिक आधार क्रमांक निष्क्रिय (Deactivate) केले आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने बुधवारी जाहीर केले की, हे सर्व क्रमांक मृत व्यक्तींचे असून, आधार डेटाबेस अचूक आणि अद्ययावत ठेवण्यासाठी UIDAI ने हे मोठे पाऊल उचलले आहे. ओळखीची फसवणूक (Identity Fraud) आणि कल्याणकारी योजनांच्या फायद्यांसाठी आधार क्रमांकांचा गैरवापर रोखण्यासाठी ही स्वच्छता मोहीम आवश्यक असल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.
मृत व्यक्तींची ओळख पटविण्यासाठी, UIDAI ने भारताचे रजिस्ट्रार जनरल (RGI), राज्य सरकारे, केंद्रशासित प्रदेश, सार्वजनिक वितरण व्यवस्था (PDS) आणि राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम (NSAP) यासह विविध एजन्सींकडून डेटा गोळा केला आहे. ही प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी, UIDAI आता बँका आणि इतर वित्तीय संस्थांसोबतही काम करण्याची तयारी करत आहे. प्राधिकरणाने स्पष्ट केले की, आधार क्रमांक कधीही इतर कोणालाही पुन्हा नियुक्त केले जात नाहीत (Reassigned). एकदा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला की, त्याचा आधार क्रमांक बेकायदेशीरपणे वापरला जात नाही याची खात्री करण्यासाठी तो आधार क्रमांक निष्क्रिय करणे आवश्यक आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, UIDAI ने myAadhaar पोर्टलवर “कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूची तक्रार करणे” नावाचे एक विशेष फीचर लाँच केले आहे. ही सेवा सध्या नागरी नोंदणी प्रणाली (CRS) वापरणाऱ्या २५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये उपलब्ध आहे. मृत्यूची तक्रार करण्यासाठी, कुटुंबातील सदस्याला प्रथम पोर्टलवर स्वतःची पडताळणी करावी लागते. त्यानंतर मृत व्यक्तीचा आधार क्रमांक, मृत्यू नोंदणी क्रमांक आणि इतर मूलभूत तपशील प्रविष्ट करावे लागतात. UIDAI सबमिट केलेल्या माहितीचे पुनरावलोकन करते आणि पडताळणीनंतर, आधार क्रमांक निष्क्रिय करण्याची प्रक्रिया सुरू करते. आधार डेटाबेसची शुद्धता आणि सुरक्षा राखण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.







