वृत्तसंस्था : एशिया कप रायझिंग स्टार्स २०२५ स्पर्धेतील पहिल्या सेमीफायनलचा सामना भारत अ आणि बांगलादेश अ या या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळाली. धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी दिलेल्या आव्हानाची बरोबरी केली. शेवटी सामन्याचा निकाल हा सुपर ओव्हरमध्ये लागला. सुपर ओव्हरमध्ये भारतीय संघाला विजय मिळवण्याची संधी होती. पण कर्णधार जितेश शर्माकडून झालेल्या २ चुका भारतीय संघाला महागात पडल्या आणि त्यामुळेच भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या बांगलादेश अ संघाने २० षटकांअखेर १९४ धावा केल्या होत्या. त्यामुळे भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १९५ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला हवी तशी सुरूवात मिळाली होती. वैभवने २५३ च्या स्ट्राईक रेटने ३८ धावा केल्या होत्या. तर प्रियांश आर्यने ४४ धावांची खेळी केली. शेवटी कर्णधार जितेश शर्माने ३३ आणि नेहाल वढेराने ३२ धावा केल्या. शेवटच्या षटकात भारतीय संघाला विजयासाठी १६ धावा करायच्या होत्या. त्यावेळी आशुतोषने चौकार आणि षटकार मारून भारतीय संघाला विजयाच्या अगदी जवळ पोहोचवलं. शेवटी २ चेंडूत ४ धावा करायच्या होत्या. पाचव्या चेंडूवर आशुतोष बाद होऊन माघारी परतला. त्यामुळे शेवटच्या चेंडूवर ४ धावांची गरज होती. भारतीय फलंदाजांनी धावून ३ धावा घेतल्या आणि सामना बरोबरीत राहिला.
सुपर ओव्हरमध्ये संघातील स्फोटक फलंदाज उतरतात, जे पहिल्या चेंडूपासून मोठे फटके खेळू शकतात. भारतीय संघाकडून जितेश शर्मा आणि रमनदीपची जोडी मैदानावर उतरली. वैभव सूर्यवंशीसारखा फॉर्ममध्ये असलेला फलंदाज असताना त्याला फलंदाजीला न पाठवणं, हा जितेश शर्माचा निर्णय सर्वांनाच खटकला. त्यानंतर पहिल्याच चेंडूचा सामना करत असताना त्याने असा काही फटका मारण्याचा प्रयत्न केला, की चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क झाला नाही. चेंडू थेट यष्टीला जाऊन धडकला. त्यामुळे पहिल्याच चेंडूवर भारतीय संघाला मोठा धक्का बसला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर आशुतोष झेलबाद होऊन माघारी परतला. भारतीय संघाला एकही धाव करता आली नाही.







