वृत्तसंस्था : भारतीय महिला क्रिकेट संघाने महिला वन डे विश्वचषक २०२५ मध्ये ऐतिहासिक विजय मिळवत भारताचे नाव जगभरात गौरवाने झळकवले आहे. या अभूतपूर्व कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी, ५ नोव्हेंबर २०२५ रोजी विश्वविजेत्या महिला संघाची भेट घेणार आहेत. या विजयानंतर मोदींनी सोशल मीडियावर ट्विट करत संघाचे अभिनंदन केले . त्यांनी म्हटलं होतं , “या खेळाडूंनी कौशल्य, आत्मविश्वास आणि टीमवर्कच्या जोरावर इतिहास घडवला आहे. हा विजय भावी पिढीतील खेळाडूंना प्रेरणा देणारा ठरेल”. आता ते प्रत्यक्ष भेटीत संघाशी संवाद साधून त्यांना विशेष सन्मान प्रदान करतील. हा क्षण भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी गौरवशाली ठरणार आहे.
मोदी सरकारने गेल्या काही वर्षांत खेळांना राष्ट्रनिर्माणाचा अविभाज्य भाग मानत अनेक सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाला ३,७९४ कोटी रुपयांचे विक्रमी बजेट देण्यात आले आहे, जे २०१४-१५ च्या तुलनेत तब्बल १३० टक्क्यांनी अधिक आहे. ‘खेलो इंडिया’ आणि ‘टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम (TOPS)’ या योजना भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी गेमचेंजर ठरल्या आहेत. TOPS अंतर्गत ऑलिम्पिकसाठी पात्र खेळाडूंना दरमहा ५०,००० रुपये स्टायपेंड आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण दिले जाते, तर ‘खेलो इंडिया’मुळे ग्रामीण भागातील प्रतिभेला मोठा मंच मिळाला आहे. आतापर्यंत १९ खेलो इंडिया स्पर्धा पार पडल्या असून २७८१ पेक्षा जास्त खेळाडूंना थेट लाभ मिळाला आहे. या उपक्रमांचा परिणाम म्हणून २०२२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने १०७ पदके आणि पॅरालिम्पिकमध्ये २९ पदकांसह सर्वोत्तम कामगिरी केली. देशभरातील १०५७ खेलो इंडिया केंद्रे, ३४ उत्कृष्टता केंद्रे आणि ‘अस्मिता महिला लीग्स’मुळे महिलांचा खेळातील सहभाग झपाट्याने वाढला आहे.या सर्व प्रयत्नांमुळे भारतातील क्रीडा संस्कृती नव्या उंचीवर पोहोचत आहे.







