वृत्तसंस्था : बिहारमध्ये छठ पूजेच्या उत्सवावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. राज्यात ४८ तासात झालेल्या वेगवेगळ्या दुर्घटनेत आतापर्यंत तब्बल ८३ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महिला अन् तरूणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. छठ महापर्वाच्या पूजेच्या बिहारमध्ये आनंदाचे वातावरण होते, देशभरात गेलेले बिहारी आपल्या घरी परतले. घरात आनंद, उत्सवाचे वातावरण होते. पण याच आनंदावर विरजण पडले. पूजेच्या वेळी पाय घसरून पाण्यात पडल्यामुळे राज्यात ८३ जणांचा मृत्यू झाला आहे. पटनामध्ये ९ जणांनी जीव गमावलाय तर दक्षिण बिहार ३४, कोसी सिमांचल, पूर्वबिहारमध्ये ३० आणि उत्तर बिहारमध्ये १९ जणांचा मृत्यू झालाय.
पटना जिल्ह्यात गंगा स्नान करताना वेगवेगळ्या ठिकाणी १५ जण बुडाले, त्यामधील ९ जणांचा मृत्यू झालाय. मोकामामध्ये ३, बिहटा आणि खगौलमध्ये प्रत्येकी दोन दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर मनेरमध्ये पाण्यात बुडून दोन आणि अथमलगोलामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. बचावपथकाकडून अनेकांना वाचवण्यात आले. पण काही जण खोल पाण्यात गेल्यामुळे तात्काळ मदत मिळू शकली नाही अन् त्यांचा मृत्यू झाला.







