वृत्तसंस्था : रणजी ट्रॉफी २०२५ चा हंगाम सुरू झाला आहे. या ट्रॉफीच्या ग्रुप डी सामन्यात जम्मू आणि काश्मीर आणि मुंबई यांच्यात एक रोमांचक लढाई सुरू आहे. या सामन्यात पहिल्या दिवशी ४० वर्षीय अनुभवी फलंदाज पारस डोग्राने पुन्हा एकदा आपली प्रतिभा दाखवून दिली. संघ अडचणीत असताना त्याने शानदार फलंदाजी करताना, पारसने त्याचे ३२ वे शतक झळकवले. या कामगीरीसह त्याने संघाचा डाव संभाळण्याचे काम केले. या कामगिरीने तो रणजी ट्रॉफीच्या इतिहासात दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे. या खेळीसह, त्याने अजय शर्मा (३१ शतके) ला पिछाडीवर टाकले आहे. आता त्याच्या पुढे केवळ दिग्गज फलंदाज वसीम जाफर आहे, ज्याने ४० शतके ठोकली आहेत.
जम्मू आणि काश्मीरच्या डावाची सुरुवात खूपच खराब झाली. या संघाने फक्त दोन धावांत दोन विकेट गमावल्या होत्या आणि सुरुवातीच्या धक्क्यातून सावरण्यासाठी संघ संघर्ष करताना दिसत होता. या महत्त्वाच्या क्षणी पारस डोग्रा मैदानावर फलंदाजीसाठी आला. तिसरी विकेट पडताच धावफलकावर फक्त ३० धावा लागल्या होत्या, तथापि, डोग्राने अनुभव आणि संयमाचे उत्कृष्ट करत संघाला अडचणीतून बाहेर काढण्याची मोठी कामगिरी केली. त्याने अब्दुल समदसह चौथ्या विकेटसाठी ९४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली, ज्यामुळे संघाचा डाव स्थिर होण्यास मदत झाली. अब्दुल समद ४४ धावांवर माघारी गेला, परंतु पारस डोग्राने एका टोकाला बाजू सांभाळत संघाचा डाव सावरला. त्याने मुंबईच्या गोलंदाजांचा संयमाने सामना केला. पहिल्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस तो ११२ धावांवर नाबाद राहिला होता. त्याची शानदार खेळी जम्मू आणि काश्मीरसाठी महत्त्वाची ठरली, कारण त्यांनी मुंबईच्या ३८६ धावांच्या प्रत्युत्तरात ७ बाद २७३ धावा करण्यासाठी आपला संघर्ष सुरूच ठेवला.







