मुंबई : कोकणवासीयांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली कोकणातील रो-रो सेवा सुरू होण्याचा अखेर मुहूर्त सापडला आहे. मुंबई ते कोकण हा प्रवास आता सुकर होणार असून दसऱ्याच्या मुहूर्तावर रो-रो फेरीसेवा सुरू होण्याची शक्यता आहे. सागरी महामंडळाकडन याबाबत चाचपणी सुरू आहे. काही महिन्यांपासून केंद्र व राज्यस्तरीय परवानग्या, हवामान अडथळे आणि तांत्रिक कारणांमुळे ही सेवा वारंवार पुढे ढकलली जात होती. गणेशोत्सवात ही सेवा सुरू होईल, अशाप्रकारे नियोजन सुरू होते. मात्र तेव्हा काही तांत्रिक कारणांमुळं ही सेवा सुरू झाली नाही. मात्र आता सर्व आवश्यक त्या परवानग्या मिळाल्या असून हवामानही स्थिर आहे. समुद्रस्थितीही अनुकूल होत आहे. त्यामुळे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरच उद्घाटनाचा सरकारचा मानस आहे. ४० वर्षांनंतर कोकणात जलवाहतूक सुरू होणार आहे. काही दिवसांपूर्वीच बोटीची जयगड आणि विजयदुर्ग येथे चाचणी घेण्यात आली होती. ही चाचणी यशस्वीदेखील झाली होती. या बोटीमुळं रोजगार, व्यापार आणि पर्यटन यात कोकणचा विकास होणार आहे. तसंच, ही रो-रो सेवा कोकणसाठी गेमचेंजर ठरणार आहे.
मुंबईतून रत्नागिरी किंवा सिंधुदुर्गला पोहोचण्यासाठी १० ते १२ तास लागतात. तसंच, मुंबई-गोवा महामार्गाचे काम अद्याप सुरू असल्याने वाहतुककोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळं अनेकदा हा प्रवास खूपच लांबतो. मात्र जलवाहतुकीमुळं आता मुंबई ते कोकण हा प्रवास अवघ्या ३ ते ५ तासांत पूर्ण होणार आहे. मुंबई ते रत्नागिरीतल्या जयगडपर्यंत पोहोचण्यासाठी ३ ते ३.५ तासांचा वेळ आणि सिंधुदुर्ग ते विजयदुर्गपर्यंत पोहोचण्याचा वेळ ५ ते ५.५ तास इतका वेळ लागणार आहे.
- इकोनॉमी क्लाससाठी २,५०० रुपये
- प्रीमियम इकोनॉमीसाठी ४००० रुपये
- तर, बिझनेस क्लाससाठी ७५०० रुपये,
- फर्स्ट् क्लाससाठी ९००० रुपये इतके तिकीट ठेवण्यात आले आहेत.
कारचे भाडे ६००० रुपये, दुचाकीचे १००० रुपये, सायकलचे ६०० रुपये, मिनीबसचे १३००० रुपये, ३० आसनी बसचे १४५०० रुपये, ४५ आसनी बसचे १७००० रुपये आणि मोठ्या बसचे २१००० रुपये असेल. मुंबईहून सकाळी ६.३० वाजता सुटणारी रो-रो सकाळी ११ वाजता पोहोचेल. तर, अर्धा तास थांबून दुपारी ही रो-रो दीड वाजता विजयदुर्गला पोहोचेल. तर, दुपारी अडीच वाजता विजयदुर्गहून परतीच्या प्रवासाला निघणारी ही बोट रात्री नऊ वाजता पुन्हा मुंबईला पोहोचेल.







