मुंबई : जुलै २००५ च्या महापुराला जवळपास दोन दशकं लोटली आहेत. त्या घटनेनंतर भविष्यात अशा आपत्तींची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात आल्या. यामध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे मुंबईतील तबेल्यांचं स्थलांतर. मुंबई महानगरपालिकेनं घेतलेल्या निर्णयानुसार, शहरातील सर्व तबेल्यांचं स्थलांतर पालघर जिल्ह्यातील दापचरी या ठिकाणी करण्यात येणार आहे. यासंदर्भात पालिका मुख्यालयात नुकतीच एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस मुंबईतील सर्व संबंधित वॉर्डमधील तबेला मालकांना औपचारिक नोटिसा देण्याचे आदेश प्रशासनानं दिले आहेत. सन २००७ मध्ये तबेल्यांच्या स्थलांतराचा विषय मुंबई उच्च न्यायालयात गेला होता. न्यायालयाच्या निर्देशांचं पालन करत, मुंबई महापालिकेनं ऑगस्ट २०२४ मध्ये स्थलांतर प्रक्रिया सुरू केली. मात्र, या निर्णयाला तबेला मालकांनी विरोध दर्शवल्यामुळे अंमलबजावणी प्रक्रियेला विलंब झाला. या प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी काही दिवसांपूर्वी अतिरिक्त महापालिका आयुक्त अश्विनी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली.
या बैठकीला पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग, परवाना विभाग तसंच सध्याच्या तबेल्यांचं स्थान असलेल्या संबंधित प्रभागांचे सहाय्यक महापालिका आयुक्त उपस्थित होते. या बैठकीत तबेला मालकांना ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत तबेले रिकामे करण्यासाठी शेवटची नोटीस देण्याचा निर्णय घेण्यात आला. पालिकेच्या म्हणण्यानुसार, “कायदेशीर विभाग सर्व संबंधित न्यायालयीन आदेशांचा आढावा घेऊन मसुदा कागदपत्रांना अंतिम स्वरूप देईल. त्यानंतर, ३१ ऑगस्टपर्यंत गोठा मालकांना नोटिसा बजावल्या जातील. तसंच, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग दापचरी येथे रस्ते, पाणीपुरवठा आणि इतर आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची पूर्ण तयारी करेल.” पालिकेनं स्पष्ट केलं आहे की, तबेला मालकांकडून होणारा संभाव्य विरोध टाळण्यासाठी ही व्यापक पूर्वतयारी केली जात आहे. पालिकेच्या आकडेवारीनुसार, सध्या मुंबईत एकूण २६३ गोठे असून, त्यापैकी फक्त ५९ गोठ्यांकडे वैध परवाने आहेत. सर्वाधिक गोठे मालाड परिसरात असून, मालाड आणि गोरेगाव भागात एकत्रितपणे ६८ गोठे आहेत. याशिवाय, अंधेरी पूर्व येथे २७, कांदिवली पूर्व येथे २४, घाटकोपर येथे २३ आणि सांताक्रूझ पूर्व येथे २२ गोठे आहेत. याव्यतिरिक्त, भांडुप, कुर्ला, गोवंडी, चेंबूर, मुलुंड, अंधेरी पश्चिम, खार आणि वांद्रे या भागांतही गोठे विखुरलेले आहेत. पालिका प्रशासनानं स्पष्ट केलं आहे, “आरे येथील काही गोठे वन विभागाच्या जमिनीवर आहेत. ही ठिकाणं शहराच्या हद्दीबाहेर असून, त्यांच्याकडे सर्व आवश्यक परवानग्या असल्यामुळे त्यांचं स्थलांतर करण्यात येणार नाही.” २६ जुलै २००५ रोजी आलेल्या महापुरात शहरातील शेकडो गुरं वाहून गेली होती. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी मुंबईतील गोठ्यांचं स्थलांतर करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. या निर्णयाला तबेला मालकांकडून विरोध झाला आणि पुढे हे प्रकरण न्यायालयात गेलं. न्यायालयानं शासनाच्या बाजूनं निर्णय दिल्यानंतर स्थलांतराच्या प्रक्रियेला गती मिळाली. या समस्येच्या निराकरणासाठी राज्य शासनानं ‘महाराष्ट्र नागरी भागात गुरं पाळणं आणि हालचाल (नियंत्रण) कायदा, १९७६’ मध्ये सुधारणा करणारी अधिसूचना जारी केली आहे.







