मुंबई : गणेशोत्सव मंडळांने मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यांवरील वाढीव दंड अखेर मागे घेण्यात आला आहे. मंडप उभारण्यासाठी रस्त्यावर किंवा पदपथावर खड्डे खणल्यास सार्वजनिक मंडळांना प्रति खड्डा १५ हजार रुपये दंड करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला होता. हा दंड रद्द करावा अशी मागणी भाजपसहित सर्वच राजकीय पक्षांनी केली होती. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांना थेट दंड कमी करण्याचे निर्देश दिले आणि त्यानंतर तातडीने दंडाची वाढीव रक्कम कमी करण्यात आली.
मुंबई महानगरपालिकेने गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारण्यास परवानगी देण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित केली आहे. तसेच मंडळांसाठी मार्गदर्शक सूचनाचे परिपत्रकही काढले आहे. त्यात खड्ड्यांबाबत सूचना देण्यात आली आहे. या सूचनेनुसार गणेशोत्सवात मंडप उभारण्यासाठी रस्त्यावर किंवा पदपथावर खड्डे खणल्यास प्रति खड्डा तब्बल १५ हजार रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचा इशारा मुंबई महानगरपालिका प्रशासनाने परिपत्रकाद्वारे दिला होता.
आतापर्यंत प्रति खड्डा दोन हजार रुपये दंड आकारण्यात येत असताना त्यात एकदम सात पट वाढ केल्यामुळे गणेशोत्सव मंडळांनी नाराजी व्यक्त केली होती. गणेशोत्सव समितीनेही दंडाची वाढीव रक्कम कमी करण्याची मागणी केली होती. गणेशोत्सव मंडळांची ही नाराजी राजकीय पक्षांनी बरोबर हेरली. या विषयाचे राजकारणही सुरू झाले. सर्वच राजकीय पक्षांनीही या वाढीव दंडावरून मुंबई महापालिकेवर टीकाकेली. तसेच दंडाची रक्कम कमी करण्याची मागणी केली होती. गणेशोत्सव मंडळांवरील खड्डयाबाबतच्या दंडाची रक्कम कमी करून घेऊ, असे आश्वासन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी बुधवारी पालिकेच्या विभाग कार्यालयातील जनता दरबारात दिले होते. त्याला चोवीस तास उलटत नाही तोच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याशी चर्चा करून दंडाच्या रकमेत कोणतीही वाढ करू नये, असे निर्देश दिले. तसेच याबाबतची माहितीही समाज माध्यमांवर जाहीर केली.







