नवी मुंबई : पर्यावरण रक्षणासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींना बंदीची घोषणा करण्यात आली त्यानंतर पुन्हा ही बंदी हटविण्यात आली. यामुळे वर्षानुवर्षे पारंपरिक शाडू मातीच्या मूर्तिकारावर नवे संकट आले आहे. यात शाडू मातीच्या एका गोणीमागे दहा रुपयांची वाढ झाल्याने त्याचा भारही वाढला आहे. त्यामुळे सरकारने निश्चित काय तो निर्णय घेऊन मेहनतीने शाडूच्या मूर्ती बनविणाऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली जात आहे.
गेल्या कित्येक पिढ्यांपासून चिरनेर या ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाच्या गावातील चिरनेर कलानगरीत गणेशमूर्ती तयार करण्याचे काम केले जाते. सध्या येथील कारखान्यात शाडू मातीच्या मूर्ती बनविण्याच्या कामाची लगबग सुरू आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चार महिने आधीच येथील मूर्तिकार गणेशमूर्ती तयार करण्याच्या कामाला सुरुवात करतात. उरण तालुक्यात बाहेरून रंगकाम केलेल्या तयार गणेशमूर्ती विक्रीसाठी येत असल्याने, येथील पिढीजात मूर्तिकारांच्या व्यवसायावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. येथील पिढीजात कुंभार समाजाच्या मूर्तिकारांचे ग्राहक वर्षागणिक रोडावत चालले आहेत. त्यामुळे येथील मूर्तिकरांचा व्यवसाय अडचणीत आला आहे.







