बिहारमध्ये मतदारयादीच्या ‘विशेष सखोल तपासणी’वर (स्पेशल इन्टेन्सिव्ह रिव्हिजन – SIR) वाद निर्माण झाल्यानंतर निवडणूक आयोगाने रविवारी (७ जुलै) बचावात्मक पवित्रा घेत अर्जाबरोबरच कागदपत्रे सादर करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे (UIDAI) सीईओ भुवनेश कुमार यांनी म्हटलं आहे की “आधार हे ओळखपत्र म्हणून कधीच अनिवार्य नव्हते.” कुमार यांनी नुकतीच इंडिया टूडेशी बातचीत केली. यावेळी त्यांनी देशात अनेक ठिकाणी बनावट आधार कार्ड बनवले जात असल्याच्या घटनांवरही यावेळी टिप्पणी केली. तसेच यूआयडीएआय बनावट आधार कार्ड्सना कसं रोखणार याचा रोडमॅपही त्यांनी यावेळी सांगितला. ते म्हणाले, “आधार कार्डमध्ये क्यूआर कोड असतो. त्यामध्ये अंगभूत सुरक्षा यंत्रणा आहे.”
भुवनेश कुमार म्हणाले, “यूआयडीएआयने जारी केलेल्या नवीन आधार कार्डांवर एक क्यूआर कोड असतो. तसेच आम्ही एक क्यूआर कोड स्कॅनर अॅपही विकसित करत आहोत. जे आता अंतिम टप्प्यात आलं आहे. या अॅपद्वारे क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर त्याच्याशी संबधित माहिती अॅपवर दिसेल. आधार कार्डवरील व अॅपवरील माहिती जुळवून पाहता येईल आणि त्याद्वारे बनावट आधार कार्ड ओळखता येईल. तसेच या अॅपद्वारे हा प्रकार थांबवता येईल.” “काही ठिकाणी फोटोशॉप व छापील टेम्प्लेट्सचा वापर करून हुबेहुब खऱ्या आधार कार्डसारखे दिसणारे कार्ड लोकांनी बनवल्याचे प्रकार समोर आले आहेत. मात्र यूआयडीएआयच्या अॅपद्वारे खरं आधार कार्ड ओळखता येईल. हे अॅप सादर करण्याच्या (लॉन्च) अंतिम टप्प्यात आहे. लवकरच ते सादर केलं जाईल. यासंबंधीचा एक डेमो आधीच तयार करण्यात आला आहे.







