नवी दिल्ली : ‘निवडणुकीदरम्यान संकलित केल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक डेटाचा दुरुपयोग होऊ नये यासाठी हा डेटा निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर ४५ दिवसांनी नष्ट करावा,’ अशी सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्राद्वारे केली आहे. ‘निवडणूक कालावधीत आयोगाने स्थापित केलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा, वेबकास्टिंग, व्हिडीओ फिती आदीच्या माध्यमांतून जमा होणाऱ्या डेटाचा दुर्भावनापूर्ण कथने प्रस्थापित करण्यासाठी वापर होऊ शकतो. त्यामुळे जेथे निवडणुकीतील निकालास न्यायालयात आव्हान दिले गेले नसेल तेथील डेटा निवडणूक प्रक्रियेनंतर ४५ दिवसांनी नष्ट करावा,’ असे आयोगाने म्हटले आहे. आयोगाने राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना ३० मे रोजी पत्राद्वारे ही सूचना केली होती. ‘निवडणूक प्रक्रियेदरम्यान आयोगातर्फे फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी केली जाते. तसेच, सीसीटीव्ही व वेबकास्टिंगद्वारेही मोठ्या प्रमाणात डेटा जमा होतो. निवडणूक कायद्यानुसार याप्रकारे डेटा जमा करणे बंधनकारक नाही. परंतु अंतर्गत व्यवस्थापनाच्या सुविधेसाठी हे तंत्रज्ञान वापरले जाते. परंतु अलीकडच्या काळात या डेटाचा गैरवापर होत असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.







