मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एका मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या शक्यतांच्या चर्चांना उधाण आले आहे. अनेक वर्षांपासून केवळ चर्चेपुरती मर्यादित असलेली ही शक्यता यावेळी मात्र प्रत्यक्षात उतरण्याची चिन्हं दिसत आहेत. आगामी महापालिका निवडणुकांसाठी राज ठाकरे यांच्या मनसेने आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने (ठाकरे गट) पुन्हा हातमिळवणी केल्यास राज्याच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर आता महापालिका निवडणुकांसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह महायुती आणि महाविकास आघाडीनेही जोरदार तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्यासाठी काही ठोस पावलंही उचलल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे यावेळी तरी हे दोघे बंधु एकत्र येणार का, मनसे-ठाकरे गटाची युती होणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. पण या युतीसाठी मात्र मनसे आणि ठाकरे गटातील नेत्यांकडूनच विरोधाचा सुरू उमटताना दिसत आहे.







