पुणे : ‘जगातील सर्वांत सक्षम देश म्हणून भारताला पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न गरजेचे आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या गरजा ओळखून त्यांना एकत्रित घेऊन पुढे गेलो, तर भारत निश्चितच एक आदर्श देश म्हणून जगासमोर येईल. यामध्ये प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे. कोणतेही काम करताना फळाची अपेक्षा न करता ते काम प्रामाणिकपणे केल्यास यश नक्की मिळेल,’ असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. अपंग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने पिंपरी महापालिकेच्या वतीने आयोजित तीन दिवसांच्या ‘पर्पल जल्लोष’ या कार्यक्रमाचा समारोप राज्यपाल राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत झाला. त्या वेळी ते बोलत होते. खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार अमित गोरखे, मुरलीकांत पेटकर, राज्याचे दिव्यांग कल्याण आयुक्त प्रवीण पुरी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर उपस्थित होते.
‘महापालिका आणि दिव्यांग भवन फाउंडेशनने अपंगांच्या उत्कर्षासाठी, विकासासाठी उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे. हा सोहळा अपंग व्यक्तींच्या प्रबळ इच्छाशक्तीचा केलेला सन्मान आहे,’ असे सांगून राज्यपाल म्हणाले, ‘अपंग व्यक्ती समाजाचा भाग होण्यासाठी जे प्रयत्न सुरू असतात, त्याचे शब्दांत वर्णन करणे शक्य नाही. अशा प्रयत्नांना ‘पर्पल जल्लोष’च्या माध्यमातून बळ मिळते. हा सोहळा म्हणजे समाजाच्या संघटित प्रगतीचे एक उत्तम उदाहरण आहे. जन्मजात अपंगांना लवकरात लवकर मदत मिळावी, उपचार मिळावेत, यासाठी निधी देऊन, तो लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. आपल्याकडे जे काही कलागुण आहेत, त्याचा योग्य वापर करून पुढे जात राहावे. सामाजिक बांधिलकी जोपासून आपल्याकडून ज्या पद्धतीने मदत करणे शक्य होईल ती करावी.’







