पुणे : महायुती आहे तर महाराष्ट्रात विकासाला गती आहे, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. महाराष्ट्रातील निवडणुकीत गैरमार्गातून कमावलेला पैसा काँग्रेसकडून वापरला जात आहे. काँग्रेसने कर्नाटकात घोटाळे केले असून त्या पैशांचा वापर निवडणुकीसाठी करत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. पंतप्रधान मोदी पुण्यातील उमेदवारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत बोलत होते. या सभेत त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. तसेच त्यांनी महायुतीची सत्ता महाराष्ट्रात स्थापन होईल असा विश्वास देखील व्यक्त केला. पुण्यातील विकासाठी महायुती सरकार काम करत असून तेथील अनेक प्रोजेक्ट सुरू असल्याचं देखील मोदी यावेळी म्हणाले.
पुण्याचा विकास करण्यासाठी गुंतवणूक, इंडस्ट्री आणि इन्फ्रास्ट्रक्चरची गरज असून महायुती ते वाढवत आहे. त्याच्यावर काम चालू आहे. परकीय गुंतवणुकीत देखील वाढ झाल्याचे देखील पंतप्रधान म्हणाले. यावेळी काँग्रेसवर त्यांनी हल्लाबोल केला. आधीच्या महाविकास आघाडीकडे सांगण्यासारखी कामे नाहीत. त्यांन अडीच वर्ष फक्त भाजपवर टीका करण्यात घालवली. त्यामुळे महाराष्ट्रात महायुती आहे तर विकासाला गती असल्याचं मोदी म्हणालेत. आघाडीवर टीका करताना नरेंद्र मोदींनी म्हणाले, माझं आव्हान आहे, काँग्रेसच्या युवराज म्हणजेच राहुल गांधींच्या तोंडाचून बाळासाहेब ठाकरे यांचे कौतुक करावं. बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी राहुल गांधींनी चार चांगली वाक्य बोलून दाखवावी असं आव्हान मोदींनी आघाडीच्या नेत्यांना दिलं. पुढे बोलताना मोदी म्हणाले, कर्नाटक निवडणुकीच्या वेळी काँग्रेसने तेथील जनतेला खूप आश्वासने दिली. पण सरकार आल्यानंतर त्यांनी हात वर केलेत. कामे न करता तेथील जनतेकडून लूट सुरू केल्याचा आरोपही मोदींनी केलाय. कर्नाटकात काँग्रेसचे रोज नवनवीन घोटाळे समोर येत आहेत. कर्नाटकातील घोटाळ्यांचे पैसेच महाराष्ट्रातील निवडणुकीत वापरले जात असल्याचा आरोपही पंतप्रधान मोदींनी केलाय.





