मुंबई : मुंबई शहरात अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या सहा बांगलादेशी नागरिकांना ३ वेगवेगळ्या कारवाईत पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत अटक आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश आहे. अमीना उमर फारुख शेख, इम्रान आलम शेख, तमजीत शौकत मुल्ला, आलमीन जावेद सरदार, हसन नूरइस्लाम मोरल आणि सुकेराली खालेक मंडल अशी या चौघांची नावे असून, हे सर्व बांगलादेशी नागरिक आहे. बांगलादेशातील बेरोजगारी आणि उपासमारीला कंटाळून सर्वजण भारतात पळून आल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
वाडीबंदर, बीपीटी रोडवर काही बांगलादेशी नागरिक राहत असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तिथे छापा टाकून अमीना शेख या ३६ वर्षांच्या महिलेस अटक केली. दुसऱ्या कारवाईत पोलिसांनी आलमीन सरदार आणि हसन मोरल या दोघांना दिंडोशी पोलिसांच्या एका विशेष पथकाने मालाड येथील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, जागृती बस स्टॉपजवळील मंसुरी स्टोअरसमोरून अटक केली. ते दोघेही बांगलादेशी नागरिक असून सध्या वसई येथे राहत होते. तिसऱ्या कारवाईत सहार पोलिसांनी सुकेराली मंडल याला अटक केली. अन्य २ घटनेत तमजीत मुल्ला याला वर्सोवा तर इम्रानला दहिसर पोलिसांनी अटक केली.





