मुंबई : अमर महल जंक्शन येथे मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असताना १२०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीला धक्का लागल्याने शनिवार, १९ एप्रिल रोजी सकाळी ८ च्या सुमारास मोठी गळती सुरू झाली. जलअभियंता विभागाकडून युद्धपातळीवर गळती दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी जवळपास २४ तास जलवाहिनी बंद करणे गरजेचे असल्यामुळे शहर आणि पूर्व उपनगरातील काही भागांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला.
गोवंडी – मानखुर्द , चेंबूर, घाटकोपर, कुर्ला, शीव, चुनाभट्टी, लालबाग, शिवडी, वडाळा, माटुंगा, दादर आदी विविध परिसरातील नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. जलवाहिनीला गळती लागल्याचे समजताच पालिकेच्या जलअभियंता विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत दुरुस्तीकाम हाती घेतले. या दुरुस्तीकामासाठी २४ तासांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा. तसेच, पाण्याचा काटकसरीने पाणी वापर करावा, असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे. जलवाहिनी दुरुस्ती झाल्यानंतर संबंधित विभागातील पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरळीत करण्यात येणार आहे.