ठाणे : मारहाणी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात अनंत करमुसे यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर करमुसे यांनी सर्वोच्च न्यायालयात देखील धाव घेतली होती. या प्रकरणी सर्वोच्च न्यायलयाने ठाणे पोलिसांना ९० दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी ५०० पानांचं आरोपपत्र दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.ठाण्यातील अभियंता अनंत करमुसे यांना तत्कालीन गृहनिर्माण मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या अंगरक्षक आणि कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली होती. एप्रिल २०२० दरम्यान आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याच्या आरोपावरून करमुसे यांना मारहाण झाली होती. या प्रकरणी आव्हाड यांच्या विरोधात करमुसे यांनी ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात ६ एप्रिल २०२० रोजी भादंवि कलम २९२, ५०० तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा २००० च्या कलम ६६ (ई) अन्वये गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर १४ ऑक्टोबर २०२१ ला आव्हाड यांना वर्तकनगर पोलिसांनी अटक देखील केली होती. या गुन्ह्यातील दोषारोपपत्र ठाणे न्यायालयात दाखल करण्यात आहे. या प्रकरणी आनंद करमुसे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायलयाने ठाणे पोलिसांना ९० दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी ५०० पानांचं आरोपपत्र दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.
करमुसे यांना केलेल्या मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि त्यांचा सहकाऱ्यांचा बाबतीत ९० दिवसांत तपास करून पुन्हा अतिरिक्त चौथे आरोपपत्र ठाणे पोलिसांनी दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. आता या प्रकरणी आव्हाड यांच्या कलमांमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यात १२० (ब) आणि ३६४ (अ) अशी कलम लावण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आव्हाड यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या या प्रकरणी पोलिसांनी कुठल्याही प्रकारचा खुलासा केलेला नसून सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन काब्दुल्ले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्यासोबत संपर्क होऊ शकला नाही.