मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी २०२०) अंतर्गत महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) यांनी इयत्ता पहिली ते सहावीच्या नवीन अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तकांचे अनावरण केले आहे. विद्यार्थीकेंद्रित, आधुनिक आणि कौशल्याधारित शिक्षणाला चालना देण्याच्या उद्देशाने हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला असून तो सीबीएसईच्या निकषांपेक्षाही अधिक प्रभावी असल्याचा दावा बालभारतीने केला आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी ‘चाइल्ड हेल्पलाइन १०९८’, ‘टेली मानस’, ‘मनोदर्पण’ आणि ‘एनसीपीसीआर ई-बॉक्स’ यांची माहिती पुस्तकांमध्ये देण्यात आली आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुलभ आशय, ई-साहित्य आणि सांकेतिक भाषेचा समावेश करण्यात आला असून गुड टच-बॅड टच व लैंगिक संवेदनशीलता यांसारख्या महत्त्वाच्या विषयांनाही स्थान देण्यात आले आहे. पुस्तकांची पायरसी रोखण्यासाठी विशेष वॉटरमार्क आणि डिजिटल शिक्षणासाठी क्यूआर कोड देण्यात आले आहेत. तसेच सहावीच्या भूगोल पुस्तकात प्रथमच जिल्हानिहाय माहिती समाविष्ट करण्यात आली आहे.
नवीन अभ्यासक्रमात पाठांतराऐवजी कृतीआधारित आणि कौशल्याधारित शिक्षणावर भर देण्यात आला आहे. तिसरी आणि चौथीसाठी ‘आपल्या सभोवतालचे जग’ हा नवीन विषय सुरू करण्यात आला असून सहावीपासून व्यावसायिक शिक्षणांतर्गत बागकाम, कुक्कुटपालन, रोबोटिक्स आणि पर्यटन यांसारख्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. मराठी विषयात मालवणी व वऱ्हाडीसारख्या बोलीभाषांतील साहित्याचा समावेश करण्यात आला असून इंग्रजीमध्ये संभाषण कौशल्य, समीक्षण आणि बातमी लेखनावर भर देण्यात आला आहे. गणित आणि विज्ञान विषय कथा व संवादांच्या माध्यमातून अधिक सोप्या पद्धतीने शिकवले जाणार आहेत. दुसरी व तिसरीची पुस्तके १० जूननंतर उपलब्ध झाली असून चौथीची पुस्तके १५ जूनच्या आसपास मिळतील. सहावीची सर्व माध्यमांची पुस्तके २५ जूनपर्यंत उपलब्ध होतील. दरम्यान, २०२६-२७ हे शैक्षणिक वर्ष पाचवी, सातवी, नववी आणि अकरावीच्या जुन्या अभ्यासक्रमातील पुस्तकांचे शेवटचे वर्ष असणार असल्याने पालकांनी पुस्तके खरेदी करताना याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.







