मुंबई : रविवारी दक्षिण ऑफ्रिकेचा पराभव करुन महिला क्रिकेट संघाने वर्ल्डकप जिंकला आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिल्यांदाच तब्बल ५२ वर्षांनंतर ही कामगिरी केली आहे. त्यामुळे विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियावर आत कौतुकांसह बक्षिसांचाही वर्षाव होत असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे या विश्वविजेत्या खेळांडूंचं त्यांच्या त्यांच्या राज्य सरकारकडूनही सत्कार करण्यात येणार आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनीही टीम इंडिया टीममधील खेळाडू रेणुका सिंग ठाकूर हिला १ कोटींचं बक्षीस जाहीर केले आहे. मंगळवारी महाराष्ट्र सरकारनेही मंत्रिमंडळात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
टीम इंडियातील महाराष्ट्राच्या ३ खेळाडूंचा राज्य सरकारकडून सत्कार करण्यात येणार आहे. महिला विश्वचषक जिंकल्यानं अभिनंदनाचा प्रस्ताव आज मंत्रिमंडळात मांडण्यात आला. त्यानुसार या खेळाडूंना कॅश प्राईज देण्यात येणार आहे. तर संपूर्ण टीमचाही सत्कार करण्यात येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. तर आयसीसी महिला विश्वचषकावर पहिल्यांदाच भारताचे नाव कोरणाऱ्या भारतीय संघाचे आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अभिनंदन करण्यात आले. याबाबतच्या अभिनंदन प्रस्तावास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. भारतीय संघातील महाराष्ट्राच्या खेळाडू स्मृती मानधाना, जेमिमा रॉड्रीग्ज, आणि राधा यादव यांना या ऐतिहासिक विजयातील भागीदारीसाठी रोख पारितोषिकाने गौरवान्वित करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आला.







