नवी दिल्ली : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘कोकण हापूस आंबा महोत्सवा’चे उद्घाटन निवासी आयुक्त तथा सचिव श्रीमती आर. विमला यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, दिल्लीच्या बाजारपेठेत विविध प्रकारचे आंबे उपलब्ध असले तरी तो आंबा खरोखरच देवगड किंवा रत्नागिरीतील अस्सल हापूस आहे की नाही, याबाबत ग्राहकांमध्ये संभ्रम असतो. हीच बाब लक्षात घेऊन कोकणातील ‘जी.आय. टॅग’ मानांकित अस्सल हापूस थेट दिल्लीकरांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांना आता खऱ्या कोकणी हापूसची चव अनुभवता येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
या उद्घाटन सोहळ्यास विशेष आयुक्त श्वेता सिंघल, निवासी आयुक्त (गुंतवणूक) सुशील गायकवाड, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, कृषी विभागाचे सहसंचालक शिवाजी आमले, सहाय्यक निवासी आयुक्त नितीन शेंडे, स्मिता शेलार तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. उद्घाटनानंतर श्रीमती आर. विमला यांनी महोत्सवातील विविध स्टॉल्सची पाहणी केली. कोकणच्या मातीत पिकलेल्या अस्सल हापूसची गुणवत्ता आणि चव ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. दिल्लीकरांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त करताना पुढील वर्षी हा महोत्सव अधिक व्यापक स्वरूपात आणि अधिक दिवसांसाठी आयोजित करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.







