ठाणे : रस्ते सुरक्षेबाबत नियम सर्वांसाठी समान असावेत, या भूमिकेतून ठाणे पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता राज्यातील सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. नागरिकांना सुरक्षिततेबाबत जागरूक करण्यासाठी आणि स्वतः आदर्श निर्माण करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अनेकदा कर्तव्यावर असतानाही काही पोलीस हेल्मेट न वापरता वाहन चालवताना दिसतात, ज्यामुळे समाजात चुकीचा संदेश जातो आणि शिस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ स्तरावरून कठोर निर्देश देण्यात आले आहेत.
या नव्या नियमांनुसार हेल्मेट न घालणाऱ्या कर्मचाऱ्यांवर केवळ दंडात्मक कारवाईच नव्हे, तर त्यांच्या सेवापुस्तिकेतही नकारात्मक नोंद केली जाणार आहे. त्यामुळे या नियमाचे काटेकोर पालन करण्यावर भर दिला जाणार आहे. पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी सर्व कर्मचाऱ्यांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत, रस्ते अपघात टाळण्यासाठी आणि नागरिकांसमोर योग्य उदाहरण ठेवण्यासाठी ही पावले उचलण्यात आल्याचे सांगितले. या निर्णयामुळे पोलीस दलातील शिस्त अधिक बळकट होण्याबरोबरच सर्वसामान्यांमध्येही वाहतूक नियमांविषयी जागरूकता वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.







