नवी दिल्ली : कतारमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा जाहीर झाली असताना सुटका होऊन मायदेशी परतलेले नौदलाचे माजी अधिकारी रागेश गोपकुमार यांनी आनंद व्यक्त केला असून सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतीही कृतज्ञता व्यक्त केली आहे. कतारमध्ये नौदलाच्या आठ माजी कर्मचाऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा जाहीर करण्यात आली होती. तथापि, भारत सरकारच्या प्रयत्नांनी त्यांची सुटका झाली असून ते दोन दिवसांपूर्वीच मायदेशी परतले आहेत.
आम्ही जिवंत आहोत आणि घरी परतलो आहोत याचा आनंद आहे. आमच्या संरक्षण प्रशिक्षणामुळेच मी आणि माझे सहकारी तुरूंगात जिवंत राहु शकलो अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. केरळच्या राजधानीपासून १६ किमी अंतरावरील बलरामपुरम येथील आपल्या निवासस्थानी कुटुंबीयांची भेट घेतल्यावर रागेश गोपकुमार यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. ते पीटीआयशी बोलताना म्हणाले कैद ही भयंकरच असते. जेंव्हा तुम्ही दिवसातून पाच वेळा तुमच्या पत्नीशी आणि कुटुंबातील सदस्यांशी बोलत असतात आणि एके दिवशी अचानक तुमचे बोलणेच बंद होते तेंव्हा काय स्थिती असते याचा फक्त विचारच करू शकतो. भारत सरकार आणि कुटुंबीयांच्या प्रार्थनेमुळेच आमची सुटका झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: जातीने यात लक्ष घातल्यामुळे आम्ही परत येऊ शकलो. मोदी यांनी लक्ष घातले तर आपली सुटका होऊ शकते अशी आशा आम्हा सगळ्यांनाच होती. मात्र त्याला किती काळ जाईल याची पुसटशीही कल्पना आम्ही करू शकत नव्हतो असेही त्यांनी नमूद केले. परदेशात असलेला कोणीही भारतीय अडचणीत असेल आणि तो निर्दोष असल्याची जर पंतप्रधान मोदी यांची खात्री पटली तर त्याच्या सुटकेसाठी ते पुढे येतात. मग एक व्यक्ती का असेना याची सगळ्या भारतीयांनी खात्री बाळगावी अशी टिप्पणही त्यांनी यावेळी केली. भारतीय नौदलातून २०१७ मध्ये निवृत्त झालेले गोपकुमार नंतर इन्स्ट्रक्टर म्हणून ओमान डिफेन्स ट्रेनिंग कंपनीत रूजू झाले होते. त्यांच्यासह भारतीय नौदलाच्या सर्व आठ माजी कर्मचाऱ्यांवर हेरगिरीचे आरोप ठेवण्यात आले होते. मात्र कतार सरकार किंवा भारत सरकारकडूनही याची कोणती वाच्यता करण्यात आली नव्हती.