पुणे : लोणावळ्याजवळील ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावर घडलेल्या केतन अग्रवाल हत्येच्या घटनेनंतर या ठिकाणी पर्यटकांची संख्या लक्षणीयरीत्या वाढल्याचे चित्र समोर आले आहे. या प्रकरणाची राज्यभरात मोठी चर्चा झाल्यानंतर अनेक जण केतनची हत्या नेमकी कुठे झाली, आरोपींनी त्याला कोणत्या ठिकाणावरून दरीत ढकलले आणि घटनास्थळाची प्रत्यक्ष परिस्थिती कशी आहे, हे पाहण्यासाठी लोहगडावर येत आहेत. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांबरोबरच दिल्लीसारख्या दूरच्या भागांतूनही पर्यटक येथे येत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. समाजमाध्यमे आणि विविध प्रसारमाध्यमांमध्ये या प्रकरणाला मोठी प्रसिद्धी मिळाल्यानंतर घटनास्थळ पाहण्याबाबत अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. यामुळे पूर्वी ट्रेकिंग आणि ऐतिहासिक वारशासाठी ओळखला जाणारा लोहगड आता या गुन्हेगारी प्रकरणामुळेही चर्चेत आला आहे. सुट्टीच्या दिवशी पूर्वी सरासरी एक हजार पर्यटक किल्ल्यावर येत असत, मात्र आता ही संख्या पंधराशेच्या पुढे गेल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. आठवड्याच्या इतर दिवशीही पूर्वी सुमारे चारशे पर्यटक येत असताना आता सहाशेहून अधिक पर्यटक किल्ल्याला भेट देत आहेत. कुटुंबांसह फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांबरोबरच युवक-युवतींची संख्याही वाढली आहे. अनेक जण स्थानिकांकडे घटनास्थळाची माहिती विचारत असून आरोपी कोणत्या मार्गाने गेले, दरी किती खोल आहे, अशा प्रश्नांची विचारणा करत आहेत. काही पर्यटक घटनास्थळी छायाचित्रे आणि चलतचित्रेही टिपताना दिसत आहेत. वाढलेल्या पर्यटकांमुळे चहा, नाश्ता, पिण्याचे पाणी, स्थानिक खाद्यपदार्थ आणि वाहनतळ सुविधा पुरविणाऱ्या व्यावसायिकांच्या व्यवसायाला काही प्रमाणात चालना मिळाल्याचेही स्थानिक व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, या घटनेकडे केवळ पर्यटनाच्या दृष्टीने पाहण्याऐवजी संवेदनशीलतेने पाहण्याची गरज असल्याचे मत स्थानिक नागरिक आणि अनेक पर्यटकांनी व्यक्त केले आहे. एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या ठिकाणी केवळ कुतूहलापोटी गर्दी करण्यापेक्षा त्या घटनेतून समाजाने योग्य बोध घ्यावा, अशी भावना व्यक्त होत आहे. काही पर्यटकांनी अनधिकृतपणे या ठिकाणाला ‘सिया पॉईंट’ असे संबोधण्यास सुरुवात केली असून, याबाबत सुरक्षा रक्षक आणि स्थानिकांकडे विचारणा होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच हे नाव काही डिजिटल नकाशांवरही दिसत असल्याच्या चर्चेमुळे इतिहासप्रेमी आणि गडप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आणि सुमारे दोन हजार वर्षांचा इतिहास लाभलेला लोहगड किल्ला सातवाहन काळापासून ऐतिहासिक वारसा जपणारा महत्त्वाचा दुर्ग आहे. अशा किल्ल्याची ओळख एका दुर्दैवी गुन्हेगारी घटनेशी जोडली जाणे योग्य नसल्याचे इतिहास अभ्यासकांचे मत आहे. समाजमाध्यमांवर या घटनेवर आधारित चलतचित्रे, विनोदी चित्रफिती आणि विविध प्रकारचा मजकूर प्रसारित होत असल्याबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. लोहगडाचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि वारसामूल्य जपत पर्यटकांनी जबाबदारीने आणि संवेदनशीलतेने वागावे, तसेच अशा दुर्दैवी घटनेचे आकर्षण निर्माण करण्याऐवजी इतिहासाचा आदर राखणारे पर्यटन करावे, असे आवाहन स्थानिक नागरिक, गडप्रेमी आणि इतिहासप्रेमींनी केले आहे.







