मुंबई : मुंबई पोलिसांच्या नुकत्याच पार पडलेल्या भरतीतील लेखी परीक्षेत कॉपीसाठी वापरण्यात आलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान पाहून पोलिस चक्रावले आहेत. मुंबईत परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्याला शेकडो किमी दूरवरून कुणीतरी उत्तरे सांगत होता. अशा कॉपीसाठी चिनी तंत्रज्ञानाचा वापर केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. पोलिसांच्या तीन पथकांनी मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून २५ हून अधिक जणांना अटक केली असून, यामध्ये काही उमेदवार आहेत. मुंबई पोलिस दलातील कॉन्स्टेबलच्या ७०७६ पदांसाठी सुमारे ५ लाख ८१ उमेदवार मैदानात उतरले होते. ३१ जानेवारीपासून या पदांसाठी मैदानी चाचणी सुरू झाली. दोन लाखांपेक्षा अधिक उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले. मात्र उपलब्ध पदे आणि एकूण उमेदवार यांच्यातील संख्येनुसार प्रमाण ठरविण्यात आले. त्यानुसार ८३ हजार ७४३ उमेदवार पात्र ठरले. या सर्व उमेदवारांची लेखी परीक्षा ७ मे रोजी मुंबईतील विविध कॉलेजे आणि शाळांतील २१५ केंद्रांवर घेण्यात आली. राज्यभरातून ७८ हजार ५२२ उमेदवार रविवारी लेखी परीक्षेला बसले होते. २१५ परीक्षा केंद्रांवर १२४६ अधिकारी आणि ५९७५ कर्मचारी बंदोबस्ताला तैनात होते. यावेळी एक उमेदवार प्रश्नपत्रिकेकडे न पाहता केवळ उत्तरे लिहित असल्याचे पर्यवेक्षकांच्या लक्षात आले. त्याची झडती घेतली असता डेबिट कार्डाच्या आकाराचे एक कार्ड आढळले. शर्टावर बटण कॅमेरा आणि कानात खोलवर ‘इलेक्ट्रिक इअरबर्ड’ आढळले. पहिल्याच दिवशी भांडुप, गोरेगाव, मेघवाडी, कस्तुरबा मार्ग आणि दहिसर येथे पाच गुन्हे दाखल करण्यात आले.
हायटेक तंत्रज्ञान वापरून कॉपी केल्याचा प्रकार प्रथमच उजेडात आल्याने मुंबई पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली. तीन पोलिस उपायुक्तांच्या देखरेखीखाली तीन पथके तयार करण्यात आली. तांत्रिक विश्लेषण, तपास कौशल्य आणि खबऱ्यांचे जाळे विणून पोलिसांच्या पथकांनी वेगवेगळ्या भागांतून आत्तापर्यंत सुमारे २५हून अधिक आरोपींना अटक केली आहे. भांडुप पोलिसांनी याप्रकरणात दोन उमेदवारांनाही अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना १९ जूनपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे. शैक्षणिक पात्रता नसलेला एकही उमेदवार पोलिस दलात नियुक्त होऊ नये याची खबरदारी मुंबई पोलिसांनी घेतली. कॉपीची पाळेमुळे छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या जिल्ह्यांत खोलवर रुजली असून, ती खणून काढण्यासाठी पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे या कॉपी रॅकेटमध्ये एक विशिष्ट समाजाच्या टोळ्या सक्रिय असल्याची बाब आत्तापर्यंतच्या तपासातून समोर आली आहे. लेखी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांकडून प्रत्येकी आठ लाखांपासून सुमारे पंधरा लाख रुपयांपर्यंत पैसे घेण्यात आल्याचे तपासातून पुढे आले आहे. विशेष म्हणजे ही मोठी साखळी असून, यामध्ये उमेवारांपासून उत्तरे सांगणाऱ्या आणि त्याला सांगायला लावणाऱ्यांपर्यंत अनेकजण गुंतलेले असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींनी सरकारी खात्यांमधील विविध पदांच्या इतरही परीक्षांमध्ये अशाच प्रकारे कॉपी केल्याचे त्यांच्या चौकशीतून समोर आले आहे. मुंबईमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या लिपिक पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. खारमध्ये एका परीक्षा केंद्रावर अशाच पद्धतीने कॉपी करताना एकाला पकडण्यात आले.





