मुंबई : राज्यातील शाळांचा खालावत जाणार शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी लेखी मागणी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्याकडे केली आहे. काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह शरद पवारांची साथ सोडत शिंदे- फडणवीस सरकार सोबत जाण्याचा निर्णय घेतला. अजित पवारांसोबत राष्ट्रवादीच्या ९ नेत्यांनी सरकारमध्ये प्रवेश केला. यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह आणि पक्ष आपलाच आहे आणि आम्ही राष्ट्रवादी पक्ष म्हणूनच सत्तेत सामील झालो आहोत असा दावा अजित पवार यांनी केला होता. अजित पवारांनी केलेल्या या बंडामुळे शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले. यानंतर सद्या मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपावरून सरकार मध्ये रस्सीखेच सुरू आहे.
शरद पवारांनी लिहिलेल्या पत्रात खालावत जाणा-या शैक्षणिक दर्जा विषयी चिंता व्यक्त करण्यात आली.
शरद पवार यांनी या पत्रात म्हटले आहे की, ‘सक्षम शैक्षणिक व्यवस्था ही समाज सुधारण्यास कारणीभूत ठरत असते. महाराष्ट्रात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारख्या अनेक शिक्षणमहर्षींनी हेच तत्व ओळखून सक्षम शालेय व्यवस्था उभारण्याला प्राधान्य दिले. मात्र आजच्या काळात राज्यातील शाळा व्यवस्थापनाचा दर्जा खालावला जाणे ही महाराष्ट्राच्या गुणवत्तादायी शैक्षणिक परंपरेला गालबोट लावणारी बाब आहे असेही त्यांनी नमुद केले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने २०२२- २३ड या शैक्षणिक वर्षासाठी प्रसिद्ध केलेल्या परफॉर्मेंस ग्रेडिंग इंडेक्स २.० (पीजीआय ) अहवालानुसार महाराष्ट्र राज्याची दुसऱ्या स्थानावरून थेट सातव्या स्थानावर घसरण झाली आहे हे सुद्धा या पत्रात सांगण्यात आले आहे. ज्या निकषांच्या आधारे हे मूल्यमापन केले जाते त्यामध्ये अध्ययन निष्पत्ती व गुणवत्ता, पायाभूत सुविधा, बदलती शैक्षणिक प्रक्रिया आदी मुद्द्यांचा समावेश होतो. पण परफॉर्मेंस ग्रेडिंग इंडेक्स २.०(पी जी आय) अहवालानुसार महाराष्ट्रात या महत्वपूर्ण घटकांना गांभीर्याने घेतले गेल्याचे दिसून येत नाही असेही त्यांनी ह्या पत्रात नमूद केले आहे.
राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थी पट संख्या कमी असल्यामुळे त्या बंद करण्याच्या चर्चा होत आहेत. याची शासनाने दखल घ्यावी असे या पत्रातून सांगण्यात आले आहे. राज्याच्या शाळा व्यवस्थापनाचा खालावत जाणारा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी आणि शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीत अग्रस्थानी आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा आहे शरद पवार यांनी या पत्रातून व्यक्त केली आहे.