मुंबई : आरोग्याच्या दृष्टीने औषधांची गुणवत्ता व डॉक्टरांनी दिलेल्या निर्देशानुसार औषधे देणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामध्ये फार्मसिस्टची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. मात्र, मुंबई आणि ठाण्यातील जवळपास दोनशे ठिकाणी फार्मसिस्टची उपलब्धता नसल्याचे आढळून आले आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या एक्सएलएन पोर्टलवर तशी नोंद आहे व याप्रकाराची प्रशासनाने गांभीर्याने नोंद घेत कारवाई करावी, अशी मागणी ‘ऑल फूड अण्ड ड्रग्ज होल्डर असोसिएशन’चे अध्यक्ष अभय पांडे यांनी प्रशासनाकडे केली आहे. औषध विक्रेत्यांच्या उपस्थितीशिवाय कोणत्याही रुग्णाला औषध देऊ नये, असे कायद्यामध्ये नमूद करण्यात आले आहे. ज्या दुकानांमध्ये फार्मसिस्टची उपस्थिती नाही, तेथून विकण्यात आलेल्या औषधांच्या संदर्भात तत्काळ ऑडिट करणे गरजेचे आहे. या कालावधीमध्ये किती औषधे विकली गेली, त्यांची नोंद ठेवण्यात आली होती का, जर नोंदणीकृत औषधविक्रेत्यांची उपस्थिती नव्हती, तर दिलेल्या ग्राहकांना त्यावेळी देण्यात आलेल्या औषधांची जबाबदारी कुणाची असे प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.
मुंबईसह कोकण आणि राज्यातील अन्य विभागांमध्ये एकूण ३४६० दुकानांची तपासणी कऱण्यात आली. यामध्ये २७७ दुकानांमध्ये फार्मसिस्ट गैरहजर असल्याचे समोर आले होते. त्यावेळी २४६ औषध विक्रेत्यांना प्रशासनाने औषध विक्री बंद करण्याचे आदेश दिल होते, तर २७७ जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्या कारवाईनंतर अशा प्रकारांना चाप लागेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. दोन वर्षांपूर्वी एफडीएने केलेल्या पाहणीमध्ये कोकण भागातील ८०१ औषध दुकानांच्या तपासणीमध्ये ७१ दुकानांमध्ये फार्मसिस्ट उपस्थित नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली होती. त्यामध्ये ठाणे जिल्ह्यात ४६, पालघरमध्ये २०, रायगडमध्ये ५ दुकानांचा समावेश आहे. यापैकी ५६ विक्रेत्यांना औषधविक्री बंद करण्याचे आदेशही देण्यात आले होते. अन्न व औषध प्रशासनाने यासंदर्भात माहिती दिली. काही जण व्यवसाय बंद करतात; पण त्याची ऑनलाइन नोंद करीत नाहीत. त्यामुळे काही दुकानांमध्ये औषध विक्रेता नसल्याचे दिसते. आमचे औषध निरीक्षक ठराविक कालावधीने सर्व औषध दुकानांची तपासणी करत असतात. त्यामुळे असा काही प्रकार झाला असेल याची शक्यता नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.