मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये काही भागात शनिवारी सकाळपासून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. विशेषत: उपनगर परिसरात पावसाची नोंद झाली आहे. ढगांच्या गडगडाटासह काही भागांत सरी कोसळल्या. दरम्यान, आज मुंबईसह ठाणे, पालघर परिसरात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज सकाळी काही भागात पावसाने हजेरी लावली. वांद्रे, पवई, दादर, वरळी या भागांत हलक्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला आहे. आज मुंबईत काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी काही ठिकाणी गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. सायंकाळनंतर पावसाचा जोर राहील. तसेच दिवसभर ढगाळ वातावरण असेल. दरम्यान, गुजरात आणि उत्तर कोकणच्या किनाऱ्यालगत अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहत आहेत.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून वळिवाचा पाऊस सुरुच आहे. आजही अनेक भागात सतर्कतेचा इशारा (यलो अलर्ट) देण्यात आला आहे. आज संपूर्ण विदर्भासह, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. तर विदर्भातील यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता कायम आहे.







