नवी मुंबई : तुर्भे औद्योगिक परिसरात मुदत संपलेल्या खाद्यपदार्थांच्या पाकिटांवरील उत्पादन व मुदत समाप्तीच्या तारखांमध्ये फेरफार करून ते पुन्हा विक्रीसाठी तयार करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) मदतीने केलेल्या संयुक्त कारवाईत सुमारे ७५ लाख २१ हजार रुपयांचा संशयित खाद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखेला २४ ऑगस्ट रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तुर्भे येथील टीटीसी औद्योगिक वसाहतीतील मे. साधना एंटरप्रायझेसच्या गोदामावर छापा टाकण्यात आला. तपासादरम्यान खाद्यपदार्थांच्या पाकिटांवरील मूळ उत्पादन तारीख आणि मुदत समाप्तीची तारीख थिनरने पुसून त्यावर इंकजेट मशीनद्वारे नव्या तारखा छापल्या जात असल्याचे समोर आले. काही उत्पादनांवरील मूळ घटकांची माहिती आणि पोषणमूल्य झाकण्यासाठी स्टिकर्स लावल्याचाही संशय व्यक्त करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात साठा असल्याने एफडीए अधिकाऱ्यांनी अनेक दिवस तपासणी करून एकूण ४,९४२ कार्टन्समधील मालाची मोजदाद केली. जप्त साठ्यात कुरकुरे, लेज, बिंगो, मॅगी नूडल्स, नॉर सूप, विविध मसाले, कसुरी मेथी, देगी मिरची, वाघ बकरी चहा, हेलमन्स मेयोनीज, तयार ग्रेव्ही तसेच थम्स अप, लिम्का आणि विना-लेबल सुकामेव्याचाही समावेश आहे. या प्रकरणी अन्न सुरक्षा व मानके अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेअंतर्गत तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एफडीएने साधना एंटरप्रायझेसचा अन्न व्यवसाय परवाना तात्काळ निलंबित केला आहे.
तपासात गोदामात १८ निर्यातदार कंपन्यांचा माल साठवलेला असल्याचे समोर आले असून त्यापैकी ११ निर्यातदारांच्या उत्पादनांवरील तारखांमध्ये फेरफार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. उर्वरित मालाची तपासणी अद्याप सुरू असून आणखी किती उत्पादनांमध्ये अशा प्रकारचा फेरफार झाला आहे, हे पुढील तपासानंतर स्पष्ट होणार आहे. या प्रकरणी साधना एंटरप्रायझेसचे भागीदार जयप्रकाश संचतीराम सिंग (२७) आणि जया नवरंग बहादूर सिंग (२६) यांना अटक करण्यात आली आहे. संबंधित निर्यातदारांच्या सूचनेनुसार मालावरील तारखांमध्ये बदल करण्यात आला होता का, तसेच हा संशयित माल देशांतर्गत बाजारपेठेत विक्रीसाठी पाठविण्यात आला की परदेशात निर्यात करण्यात आला, याचाही गुन्हे शाखेकडून सखोल तपास सुरू आहे. या गैरप्रकारामागे केवळ गोदामातील फेरफार आहे की त्याची व्याप्ती आणखी मोठी असून इतर व्यापारी किंवा निर्यातदारही यात सहभागी आहेत, याचाही शोध घेतला जात आहे. जप्त केलेल्या मालाची पुरवठा साखळी, तो यापूर्वी बाजारात पोहोचला होता का आणि ग्राहकांपर्यंत किती प्रमाणात विक्री झाला, याबाबतही चौकशी सुरू आहे. ही धडक कारवाई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सहपोलीस आयुक्त दीपक साकोरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रमोदकुमार शेवाळे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांच्या पथकाने केली असून या प्रकरणामुळे अन्नसुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.






