नवी दिल्ली : नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी राजधानी दिल्ली सज्ज होत असताना, रात्रभर चाललेल्या कारवाईत शेकडो आरोपींना अटक करण्यात आली आहे. दक्षिण आणि दक्षिण-पूर्व दिल्ली जिल्ह्यांमध्ये अटकेची संख्या ६६० पेक्षा जास्त होती. ‘ऑपरेशन आघात ३.०’ अंतर्गत केलेल्या या प्रतिबंधात्मक कारवाईत डझनभर शस्त्रे, लाखो रुपयांची रोकड, अवैध दारू, अंमली पदार्थ आणि इतर चोरीचा मालही जप्त करण्यात आला. सणासुदीच्या काळात गुन्हेगारी रोखणे हा या कारवाईमागील उद्देश होता. संशयित गुन्हेगारांना ताब्यात घेण्यासाठी आज सकाळपर्यंत २४ तासांच्या कालावधीत संवेदनशील भागांमध्ये शोधमोहीम राबवण्यात आली. ही संयुक्त कारवाई दक्षिण आणि दक्षिण-पूर्व जिल्हा पोलिसांनी केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या सुरक्षा मोहिमेदरम्यान केवळ दक्षिण-पूर्व जिल्ह्यातच २८५ अटक करण्यात आल्या. या सर्व अटक शस्त्रास्त्र कायदा, उत्पादन शुल्क कायदा, एनडीपीएस कायदा आणि जुगार कायद्यासह विविध कायद्यांच्या कलमांखाली करण्यात आल्या आहेत. या मोहिमेचा भाग म्हणून २८०० हून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली, असं दिल्ली पोलिसांचे सहपोलीस आयुक्त (सुरक्षा) एस.के. जैन यांनी सांगितलं आहे. नवीन वर्षाच्या काळात गुन्हेगारीमुक्त उत्सव साजरा व्हावा यासाठी दोन्ही जिल्ह्यांमध्ये ८५० लोकांना ताब्यात घेण्यात आले. ‘ऑपरेशन आघात ३.०’ अंतर्गत, सुमारे १५५ ‘कुख्यात गुन्हेगारांना’ किंवा सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आलं , असं पोलिसांनी सांगितलं. या मोहिमेदरम्यान मालमत्तेशी संबंधित गुन्हे करणाऱ्या १० जणांनाही अटक करण्यात आली. “या संपूर्ण मोहिमेचं मुख्य लक्ष संघटित गुन्हेगारी, विशेषतः अंमली पदार्थ विक्रेते, अवैध दारू विक्रेते, जुगारी आणि सराईत गुन्हेगारांविरुद्ध होता. पोलिसांनी शस्त्र कायद्यांतर्गत ६६ गुन्हे दाखल करून ६६ जणांना अटक केली. जप्त केलेल्या वस्तूंमध्ये २४ गावठी पिस्तूल आणि ४४ चाकूंचा समावेश होता. २२ हजार ५०० पेक्षा जास्त अवैध दारू जप्त करण्यात आली असून, या प्रकरणी ६० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. छाप्यांदरम्यान १० किलो गांजा जप्त करत इतर दहा जणांना अटक करण्यात आली. याव्यतिरिक्त, सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या ३५० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली. या मोहिमेत वाहन चोरीच्या टोळ्यांचा पर्दाफाश करण्यावरही लक्ष केंद्रित करण्यात आले. सणासुदीच्या काळात उत्सव साजरा करणाऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी पाच वाहन चोरांना अटक करण्यात आली. याशिवाय, छाप्यात २३१ दुचाकी आणि एक चारचाकी वाहनही जप्त करण्यात आले. दोन जिल्ह्यांमध्ये जुगारविरोधी कायद्यांतर्गत किमान ३० गुन्हे दाखल करण्यात आले असून, ६८ जुगारांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून २.३ लाख रुपये रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे. सुमारे ३५० चोरीला गेलेले किंवा हरवलेले मोबाईल फोनही हस्तगत करण्यात आले असून, ते त्यांच्या मूळ मालकांना परत केले जातील, असे पोलिसांनी सांगितले.







