पुणे : आंबेगाव पठार येथे एका लहान मुलावर भटक्या श्वानांनी हल्ला चढवून जबर जखमी केले. शहरात भटक्या श्वानांचा त्रास दिवसेंदिवस वाढतच असून, भटके श्वान चावल्याच्या दरमहा सरासरी दोन हजार घटना घडत आहेत. भटक्या श्वानांच्या प्रश्नाकडे महापालिका प्रशासनाने गांभीर्याने पाहावे, अशी नागरिकांची मागणी आहे. आंबेगाव पठार येथे शुक्रवारी सकाळी पार्किंगमध्ये खेळत असलेल्या एका लहान मुलावर दोन ते तीन भटक्या श्वानांनी हल्ला केला. भारती विद्यापीठाच्या मागे असलेल्या चंद्रांगण सोसायटीमध्ये हा प्रकार घडला. हल्ल्यात जखमी झालेल्या मुलावर भारती विद्यापीठ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महापालिकेने या घटनेची दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही सुरू केली असल्याची माहिती आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
लहान मुलावर श्वानाने केलेल्या हल्ल्याच्या या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी खासगी डॉग रेस्क्यू टीमला बोलाविले. तसेच, भटके श्वान पकडण्यासाठी स्थानिक नागरिकदेखील रस्त्यावर उतरले. काही श्वान पकडून महापालिकेच्या ताब्यात देण्यात आले. या भागात गेल्या काही महिन्यांपासून भटक्या श्वानांचा त्रास वाढला असून, प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन तातडीने कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली. आंबेगाव पठार भागात गेल्या महिनाभरात ३० श्वानांचे लसीकरण करून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तसेच, या भागात भटके श्वान पकडण्यासाठी दोन स्वतंत्र गाड्यांची आणि लसीकरणासाठी एका गाडीची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेच्या मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका फुंडे-भोसले यांनी दिली. शहरातील अनेक भागांत भटक्या श्वानांची समस्या गंभीर होत चालली आहे. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून ये-जा करावी लागत आहे. भटक्या श्वानांना पकडून त्यांची नसबंदी करण्यासाठी महापालिकेकडून नियोजन केले जाते. एप्रिल २४ ते नोव्हेंबर २४ या आठ महिन्यांच्या काळात महापालिकेने १६ हजार ४७९ श्वानांना पकडून त्यांच्यावर नसबंदी शस्त्रक्रिया करून त्यांचे लसीकरण केले आहे, असे भोसले यांनी सांगितले. शिवसेनेचे (ठाकरे गट) वसंत मोरे यांनी या घटनेवर तीव्र चिंता व्यक्त केली. याविषयी त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना निवेदन दिले असून, मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्याबरोबरच डॉग पार्क आणि डॉग शेल्टरचे काम मार्गी लावण्याची मागणी केली. ‘महापालिकेच्या शिंदेवाडी येथील जुन्या जकात नाक्याची जागा अशा उपद्रवी भटक्या श्वानांच्या उपचार व देखरेखीसाठी द्यावी, अशी मागणी मार्च २०२३ मध्ये प्रशासनाकडे केली होती. मात्र त्यावर अद्यापही कोणतीही कार्यवाही झालेली नाही,’ असे मोरे म्हणाले.





