मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या कामांसाठी मुंबई महापालिकेच्या तब्बल ६० हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. यादरम्यान महापालिकेची विभागस्तरावरील अनेक कामे खोळंबली. आता निवडणुकीचा निकाल जाहीर होऊनही आठ दिवस उलटले, तरी अद्याप सहा हजार कर्मचाऱ्यांची या कामांतून मुक्तता करण्यात आलेली नाही. परिणामी निवृत्ती वेतनासह अन्य कामांचा खोळंबा झाला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना निवडणूक कामातून मुक्त करावे, अशी मागणी महापालिकेने निवडणूक आयोगाला पत्राद्वारे केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने मुंबई महापालिका क्षेत्रासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यावर जबाबदारी सोपवली होती. त्यांच्या मदतीला एकूण सहा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी नियुक्त करण्यात आले. यामध्ये मुंबई महापालिकेतील चार अतिरिक्त महापालिका आयुक्त, तसेच मुंबई शहर जिल्हाधिकारी आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी अशा सहा जणांचा समावेश होता. निवडणूकविषयक कामासाठी सर्व यंत्रणांमध्ये समन्वय ठेवण्याची मतदारसंघनिहाय जबाबदारी या अधिकाऱ्यांकडे देण्यात आली होती.
याशिवाय महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही निवडणूक कामात समाविष्ट करण्यात आले होते. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून १२ हजार ५०० अधिकारी, कर्मचारी निवडणूक कामात गुंतले. त्यांना गटविकास अधिकारी आणि समन्वय अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर हळूहळू आणखी ५० हजार कर्मचारी या कामात व्यग्र झाले. त्यांना बूथस्तरीय अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी आदी जबाबदाऱ्यादेण्यात आल्या होत्या. यामुळे महापालिकेच्या कामांचाही बोजवारा उडाला होता. आता निकालानंतर कर्मचारी टप्प्याटप्प्याने कामावर परतत असतानाच, निवडणूक आयोगाने सगळ्या महापालिका कर्मचाऱ्यांची अद्याप निवडणूक कामांतून मुक्तता केलेली नाही. त्यामुळे महापालिकेकडून आयोगाला वारंवार विनंती केली जात आहे.





