मुंबई : मुंबईची लोकल रेल्वे ही ‘शहराची जीवनवाहिनी’ म्हणून ओळखली जाते. दररोज ७५ लाखांहून अधिक प्रवासी या रेल्वेचा वापर करतात. ही वाहतूक व्यवस्था जगातील सर्वाधिक गर्दीची उपनगरी रेल्वे सेवा आहे. पण त्याचवळी मुंबईत रेल्वे अपघातात दरवर्षी हजारो लोक आपले प्राण गमावतात. गर्दीमुळे धक्का लागून खाली पडणे, रेल्वे रुळ ओलांडताना अपघात, ट्रेनमध्ये चढताना/उतरताना तोल जाऊन पडणे, ट्रेनमधून लटकून प्रवास करताना पडणे, अशी अनेक कारणे या अपघांना कारणीभूत ठरतात. एका अहवालानुसार, दरवर्षी सुमारे २,००० ते ३,००० लोक मुंबईत रेल्वे अपघातांमध्ये जीव गमावतात. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने मुंबई उच्च न्यायालयात मागील आठ वर्षांतील रेल्वे अपघातातील मृत्यूमुखी पडलेल्यांची माहिती दिली आहे.
मध्य रेल्वेने मुंबई उच्च न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, २०२५ च्या पहिल्या ५ महिन्यांतच रेल्वे रुळांवर ओलांडताना आणि लोकल ट्रेनमधून पडून ४४३ लोकांचा मृत्यू झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर, मध्य रेल्वेने वकील अनामिका मल्होत्रा यांच्यामार्फत प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. अपघातांची मुख्य कारणे म्हणजे रेल्वे रुळांवर अतिक्रमण, ट्रॅक ओलांडताना ट्रेनने धडकणे आणि चालत्या ट्रेनमधून पडणे. मध्य रेल्वेने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात असे दिसून आले आहे की २०१८ मध्ये, ट्रॅक ओलांडताना आणि ट्रेनला धडकल्याने १०२२ लोकांचा मृत्यू झाला, तर चालत्या ट्रेनमधून पडल्याने ४८२ लोकांचा मृत्यू झाला. २०१९ मध्ये, ट्रॅक ओलांडताना ९२० लोकांचा मृत्यू झाला, तर चालत्या ट्रेनमधून पडून झालेल्या अपघातात ४२६ लोकांचा मृत्यू झाला. २०२० मध्ये, रुळ ओलांडताना ट्रेनने धडकून ४७१ लोकांचा मृत्यू झाला, तर चालत्या ट्रेनमधून खाली पडून १३४ लोकांचा मृत्यू झाला.







