मुंबई : मुंबईला चित्रपटसृष्टीची जननी म्हटलं जातं. भारतामध्ये अनेक भाषांच्या विविध चित्रपटसृष्टी आहे. बॉलीवुडची चर्चा तर जगभरात होत असते. मात्र आता भारतामध्ये पाकिस्तानी चित्रपट प्रदर्शित होत असल्यामुळे रोष व्यक्त केला जात आहे. पाकिस्तानी ‘द लेजंड ऑफ मौला जट्ट’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या पूर्वीच वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकला आहे. यामध्ये पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आणि माहिरा खान या कलाकारांनी काम केलं आहे.. यामुळे आता नवीन वाद उफाळला असून मनसेने मात्र याला तीव्र विरोध केला आहे. राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित केल्यास महागात पडेल असा थेट इशारा दिला आहे. ‘लिजेंड ऑफ मौला जट’ हा सिनेमा चर्चेच्या वर्तुळामध्ये राहिलेला आहे. हा सिनेमा भारतामध्ये प्रदर्शित केला जाणार असल्यामुळे रोष व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्रामध्ये हा ‘लिजेंड ऑफ मौला जट’ सिनेमा प्रदर्शित करण्यास मनसेचा नकार आहे. सोशल मीडिय़ावर पोस्ट करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कडक शब्दांत इशारा दिला आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, फवाद खान नावाच्या पाकिस्तानी अभिनेत्याचा, ‘लिजेंड ऑफ मौला जट’ नावाचा सिनेमा लवकरच भारतात प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सिनेमा कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. पाकिस्तानी कलाकारांचे सिनेमे मुळात भारतात प्रदर्शित का होऊ दिले जातात? आणि कलेला देशांच्या सीमा नसतात, हे सगळं इतर बाबतीत ठीक आहे, पण पाकिस्तानच्या बाबतीत हे अजिबात चालू देणार नाही. हिंदुस्थानचा द्वेष या एकमेव मुद्द्यावर जो देश तगला आहे, अशा देशातील कलाकारांना इथे आणून नाचवणं, त्यांचे सिनेमे प्रदर्शित करून देणं हा काय प्रकार सुरु आहे? महाराष्ट्र सोडाच पण देशातील कुठल्याच राज्यात हा सिनेमा तिथल्या तिथल्या सरकारांनी प्रदर्शित होऊ नाही दिला पाहिजे” अर्थात बाकीच्या राज्यांनी काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात हा सिनेमा रिलीज होऊ दिला जाणार नाही, हे नक्की. या आधी असे प्रसंग जेंव्हा आले होते तेंव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेला दणका सगळ्यांना आठवत असेल. त्यामुळे थिएटर मालकांना सध्या तरी नम्रपणे आवाहन आहे की उगाच सिनेमा प्रदर्शित करण्याच्या भानगडीत पडू नका. हा सिनेमा जेंव्हा प्रदर्शित होणार आहे, त्याच्या आसपास नवरात्रौत्सव सुरु होणार आहे. अशावेळेस कुठलाही संघर्ष महाराष्ट्रात व्हावा अशी माझी इच्छा नाही. आणि तशीच ती इच्छा राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांची पण नसणार. आणि उगाच संघर्ष आम्हाला पण नको आहे” त्यामुळे वेळीच पाऊलं उचलून हा सिनेमा आपल्याकडे प्रदर्शित होणार नाही हे पहावं. मराठी सिनेमांना थिएटर्स उपलब्ध करून देताना मागेपुढे करणाऱ्या थिएटर मालकांनी जर पाकिस्तानी सिनेमाला या भूमीत पायघड्या घातल्या, तर हे औदार्य महागात पडेल हे विसरू नये. कुठल्यातरी पाकिस्तानी सिनेमासाठी राज्यात संघर्ष होऊ नये अशीच माझी इच्छा आहे आणि सरकार त्याकडे योग्य ते लक्ष देईल याची मला खात्री आहे, अशा कडक शब्दांत राज ठाकरे यांनी आपला रोष व्यक्त केला आहे.





