अहिल्यानगर : गणेशोत्सव, श्रावण तसेच इतर धार्मिक उत्सवांमध्ये भाविकांना प्रसादाचे वाटप करणाऱ्या देवस्थान, गणेश मंडळे, सामाजिक संस्था आणि राजकीय नेत्यांसाठी अन्न व औषध प्रशासनाने महत्त्वाचे नियम स्पष्ट केले आहेत. यंदा भाविकांना प्रसाद वाटण्यासाठी संबंधितांकडे अन्न व औषध प्रशासनाचा वैध परवाना असणे आवश्यक राहणार आहे. परवान्याशिवाय प्रसादाचे वितरण केल्यास १० हजार रुपयांपासून ते १ लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. तसेच गंभीर प्रकरणांमध्ये शिक्षेचीही तरतूद करण्यात आली आहे. भाविकांच्या आरोग्याची सुरक्षितता आणि अन्नाची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी हे नियम काटेकोरपणे लागू करण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. श्रावण महिन्यात शिवालये, मारुती आणि शनिमंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असते. यावेळी विविध देवस्थान, मित्रमंडळे आणि सामाजिक संस्था प्रसादाचे वाटप करतात. मात्र, अनेकांना प्रसाद वितरणासाठी स्वतंत्र परवाना आवश्यक असल्याची माहिती नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी यापूर्वी अस्तित्वात असलेल्या नियमांची कठोर अंमलबजावणी सुरू केली असून, यापुढे विनापरवाना प्रसाद वाटणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. यासाठी ‘फॉस्कोस’ (FOSCOS) या ऑनलाइन प्रणालीद्वारे अर्ज करावा लागतो. अर्जाची पडताळणी संबंधित जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासनाच्या उपायुक्त कार्यालयामार्फत करण्यात येते आणि त्यानंतर परवाना मंजूर केला जातो. परवान्यासाठी केवळ १०० रुपये शुल्क आकारले जाते. देवस्थानांनी विश्वस्तांचे आधारकार्ड, संस्थेचा ठराव तसेच मंडळांनी धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीची कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
प्रसाद तयार करताना आणि वाटप करताना अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन करणेही बंधनकारक करण्यात आले आहे. प्रसादासाठी लागणारा कच्चा माल अधिकृत परवानाधारक विक्रेत्याकडूनच खरेदी करावा लागणार असून त्याची सर्व बिले जपून ठेवावी लागतील. शिळा किंवा उरलेला प्रसाद वाटण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच दुग्धजन्य पदार्थांचा प्रसाद तयार करताना आणि वाटताना विशेष काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आंबट आणि गोड पदार्थ एकत्र देणे टाळावे, कारण अशा विरोधी आहारामुळे अन्नबाधा किंवा अतिसाराचा धोका वाढू शकतो, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्रसाद तयार करण्यासाठी अधिकृत परवानाधारक केटररची नियुक्ती केल्यास स्वतंत्र परवाना घेण्याची आवश्यकता नसली तरी संबंधित केटररचा परवाना वैध असणे आवश्यक आहे. जिल्ह्यात सध्या शिर्डी श्री साईबाबा संस्थान, शनिशिंगणापूर श्री शनैश्वर देवस्थान आणि पाथर्डी येथील मोहटा देवस्थान या मोजक्याच देवस्थानांकडे प्रसाद वाटपाचा अधिकृत परवाना असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली आहे. नियमांचे उल्लंघन करून विनापरवाना प्रसाद वाटल्यास दंडासोबत सहा महिन्यांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. प्रसादामुळे एखाद्या व्यक्तीला गंभीर इजा झाल्यास तीन वर्षांपर्यंत, तर मृत्यू झाल्यास सात वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद आहे. त्यामुळे गणेशोत्सव आणि इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या सर्व संस्था, मंडळे आणि देवस्थानांनी नियमांचे काटेकोर पालन करून भाविकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.






