मुंबई : मुंबईतील घाटकोपर परिसरात पांढऱ्या पट्ट्यांवरून सुरू झालेला वाद आता दादरपर्यंत पोहोचला असून, गोखले मार्गावरील अशाच पट्ट्यांमुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. दादरमधील या रस्त्यावर पांढऱ्या पट्ट्या काढण्यात आल्याचे समोर आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आक्रमक झाली. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी प्रशासनाला शनिवार दुपारी ३ वाजेपर्यंत या पट्ट्या हटविण्याचा अल्टिमेटम दिला होता. त्यांच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने तत्काळ हालचाली सुरू करत सकाळीच घटनास्थळी पोहोचून संबंधित पांढऱ्या पट्ट्या पुसण्याची कारवाई हाती घेतली. गोखले मार्गावर संदीप देशपांडे यांचे जनसंपर्क कार्यालय असून, त्याच्या जवळच जैन समाजाचे देरासर आहे. त्या परिसरातील रस्त्यावर काढलेल्या पांढऱ्या पट्ट्यांबाबत माहिती मिळताच देशपांडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रशासनाने वेळेत कारवाई न केल्यास मनसे आपल्या पद्धतीने उत्तर देईल, असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतर महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांच्या देखरेखीखाली पट्ट्या हटविण्याचे काम सुरू करण्यात आले.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना संदीप देशपांडे यांनी या प्रकाराला “सांस्कृतिक दहशतवाद” असे संबोधत सार्वजनिक जागांवर कोणत्याही एका समाजाचे वर्चस्व मान्य होणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, प्रशासनाने मनसेच्या भूमिकेची दखल घेत नियोजित मुदतीपूर्वीच कारवाई सुरू केली. काही दिवसांपूर्वी विद्याविहार येथील एका गृहनिर्माण संस्थेत जैन समाजासाठी पांढरी पट्टी आखण्यात आली होती. त्यावर एका रहिवाशाने आक्षेप घेत सार्वजनिक जागेचा गैरवापर होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने त्या ठिकाणी लाल आणि पिवळ्या रंगाचे पट्टे मारून तो वाद तात्पुरता मिटविण्यात आला. मात्र त्यानंतर लगेचच दादरसारख्या संवेदनशील आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या भागात अशाच प्रकारची घटना घडल्याने पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. विरोधकांचे म्हणणे आहे की, सार्वजनिक रस्ते, सोसायटी परिसर किंवा इतर सामायिक जागा या सर्व नागरिकांसाठी असतात आणि अशा ठिकाणी कोणत्याही एका धर्मीय किंवा गटाने स्वतंत्र नियम लागू करणे योग्य नाही. या पार्श्वभूमीवर पांढऱ्या पट्ट्यांवरून जैन आणि मराठी समाजातील वाद पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला असून, प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







