वृत्तसंस्था : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना गुरुवारी (२१ डिसेंबर) खेळला गेला. पार्ल येथील बोलंड पार्क येथे झालेल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ७८ धावांनी दणदणीत पराभव केला. त्याचबरोबर भारतीय संघाने तीन सामन्यांची मालिका २-१ अशा फरकाने जिंकली. या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना संजू सॅमसनच्या शतकाच्या जोरावर २९६ धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात २९६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ ४५.५ षटकांत २१८ धावांत गारद झाला. भारतीय संघाने दुसऱ्यांदा दक्षिण आफ्रिकेत वनडे मालिका जिंकली आहे. टीम इंडियाने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात यजमान संघाचा ७८ धावांनी पराभव केला. या सामन्यात भारतासाठी अर्शदीप सिंगने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. पहिला सामनाही भारताने जिंकला होता, तर दुसरा सामना जिंकण्यात दक्षिण आफ्रिकेला यश आले होते. दक्षिण आफ्रिकेत पाच वर्षांनंतर मालिका जिंकण्यात भारताला यश आले आहे. गेल्या वेळी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली २०१८ मध्ये मालिका जिंकली होती.
पार्ल येथील बोलँड पार्क येथे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने ५० षटकांत आठ विकेट गमावत २९६ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ ४५.५ षटकांत २१८ धावांवर आटोपला. दक्षिण आफ्रिकेसाठी टोनी डी जॉर्जीने सर्वाधिक ८१ धावा केल्या. त्याने शेवटच्या सामन्यात शतक झळकावून संघाला विजय मिळवून दिला होता. यावेळी त्याला तसे करता आले नाही. कर्णधार एडन मार्करमने ३६ धावा केल्या. हेन्रिक क्लासेनने २१, रीझा हेंड्रिक्सने १९, ब्युरेन हेंड्रिक्सने १८ आणि केशव महाराजने १० धावा केल्या. रॅसी व्हॅन डर डुसेन आणि लिझाद विल्यमसन यांना प्रत्येकी दोनच धावा करता आल्या. विआन मुल्डरने एक धाव तर नांद्रे बर्गरने एक धाव घेत नाबाद राहिला. भारताकडून अर्शदीप सिंगने चार विकेट घेतल्या. या मालिकेत त्याने एकूण नऊ विकेट घेतल्या. आवेश खान आणि वॉशिंग्टन सुंदर यांना प्रत्येकी दोन यश मिळाले. मुकेश कुमार आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. दीर्घ कालावधीनंतर टीम इंडियात पुनरागमन करताना संजू सॅमसनने आपल्या वनडे कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. त्याने ४४व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर एक धाव घेत आपले शतक पूर्ण केले. त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे पहिले शतक आहे. संजू सॅमसनने ११४ चेंडूचा सामना करताना ४ चौकार आणि ३ षटकारंच्या मदतीने १०८ धावा केल्या. लिझाद विल्यमसनच्या चेंडूवर संजू रीझा हेंड्रिक्सकरवी झेलबाद झाला.
संजू सॅमसनने पदभार कर्णधार केएल राहुल (२१) सोबत ५० धावांची भागीदारी केली. एकूण १०१ धावांवर केएल राहुल विआन मुल्डरने बाद केला. यानंतर तिलक वर्मासह संजूने डावाची धुरा सांभाळली. संजू आणि तिलक यांच्यात १३५ चेंडूत ११६ धावांची भागीदारी झाली. तिलक वर्मा (५२) संघाच्या २१७६ धावा असताना बाद झाला. त्याला केशव महाराजने बाद केले. रिंकू सिंगने आपल्या शैलीत धावा काढल्या. २७ चेंडूत ३८ धावांची इनिंग खेळून तो बाद झाला. रिंकूसोबत वॉशिंग्टन सुंदरनेही शानदार इनिंग खेळली आणि तो ९ चेंडूत १४ धावा करून बाद झाला. अशा प्रकारे टीम इंडियाने ५० षटकात ८ विकेट गमावून २९६ धावा केल्या. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून बुरेन हेंड्रिक्सने तीन तर नांद्रे बर्गरने दोन बळी घेतले. लिझार्ड विल्यम्स, व्हियान मुल्डर आणि केशव महाराज यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.