वसई-विरार : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वसई-विरार शहरात अभूतपूर्व पूरस्थिती निर्माण झाली असून संपूर्ण शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा जोर कायम असल्याने सखल भागातील पाणी अद्याप ओसरलेले नसून शहराचा सुमारे ७० टक्के भाग पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे लाखो नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. अनेक घरांमध्ये, गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये आणि व्यावसायिक संकुलांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांसमोर अन्न, पिण्याचे पाणी आणि सुरक्षित निवाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक कुटुंबांनी नातेवाईकांच्या घरी किंवा हॉटेलमध्ये तात्पुरता आश्रय घेतला आहे. मुसळधार पावसामुळे रस्ते, बाजारपेठा, रेल्वेमार्ग आणि निवासी परिसर जलमय झाल्याने संपूर्ण शहराला जणू बेटाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हजारो कुटुंबे मागील तीन दिवसांपासून वीज, पिण्याचे पाणी आणि मोबाईल नेटवर्क यांसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. लोकल रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यामुळे हजारो प्रवाशांना वसई ते विरारदरम्यानचे सुमारे १२ किलोमीटरचे अंतर पायी चालत पार करून घरी जावे लागले. या अभूतपूर्व परिस्थितीमुळे मुंबई महानगर प्रदेशातील शहर नियोजन, जलनिस्सारण व्यवस्था आणि पायाभूत सुविधांच्या कार्यक्षमतेवरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पूरस्थितीमुळे वीजपुरवठ्यावरही मोठा परिणाम झाला असून सुरक्षेच्या दृष्टीने महावितरणने नालासोपारा, एव्हरशाइन, वसई (पूर्व), विरार (पूर्व) तसेच ग्रामीण भागातील अनेक ठिकाणचा वीजपुरवठा तात्पुरता खंडित केला. परिणामी पाणी उपसणारे पंप बंद पडल्याने उंच इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. काही भागांत पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने एका लिटरच्या पाण्याच्या बाटलीची किंमत ५० रुपयांपर्यंत पोहोचल्याचे चित्र पाहायला मिळाले. वीज आणि पाणीपुरवठा एकाचवेळी विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांचे हाल अधिकच वाढले आहेत. पुराच्या पाण्यामुळे वसई-विरार दरम्यानची उपनगरी रेल्वे सेवा आणि महापालिकेची परिवहन बससेवाही मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे. महापालिकेच्या ११४ बसांपैकी केवळ १६ बस पाच मार्गांवर अत्यंत मर्यादित स्वरूपात सुरू असून उर्वरित ३१ मार्गांवरील सेवा बंद आहे. त्यामुळे कामावर जाणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. गंभीर पूरग्रस्त भागांत अग्निशमन दलाच्या पथकांकडून बोटींच्या साहाय्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरू आहे. वाहतुकीची सर्व साधने ठप्प झाल्याने अनेक नागरिकांना ट्रॅक्टरचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र या परिस्थितीचाही गैरफायदा घेत काही ट्रॅक्टरचालकांकडून वसई ते विरार या अल्प अंतराच्या प्रवासासाठी प्रतिप्रवासी तब्बल ५०० रुपये भाडे आकारले जात असल्याने पूरग्रस्त नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त केला जात आहे.







