मुंबई : राज्यातील अकरावीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील विशेष फेरी-१चा प्रवेश निश्चित करण्याचा कालावधी उद्या (९ जुलै) संपणार असून त्यानंतर १० जुलैपासून दुसऱ्या विशेष प्रवेश फेरीला सुरुवात होणार आहे. तसेच १५ जुलैपासून राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालये नियमितपणे सुरू करण्यात येणार आहेत. राज्यातील ९ हजार ६८८ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेस आतापर्यंत १४ लाख ७३ हजार ४२० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यापैकी १० लाख ७३ हजार ९७८ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. विशेष फेरी-१साठी ४ लाख ८४ हजार ८६५ विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग-१ आणि भाग-२ पूर्ण करून पसंतीक्रम निश्चित केला होता. त्यापैकी ३ लाख ९२ हजार ६९३ विद्यार्थ्यांना जागांचे वाटप करण्यात आले. आतापर्यंत या विशेष फेरीत एकूण ३ लाख २४ हजार १०२ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला असून त्यामध्ये केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून ३ लाख १२ हजार ९८३, तर कोटा प्रवेशातून ११ हजार ११९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विभागनिहाय आकडेवारीनुसार मुंबई विभागात ५७ हजार ४०४ विद्यार्थ्यांनी, तर पुणे विभागात सर्वाधिक ६४ हजार ७४९ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. दरम्यान, राज्यातील अनेक भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विशेष फेरी-१मधील प्रवेश निश्चित करण्यासाठी दोन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुळे या फेरीतील प्रवेश निश्चित करण्याची अंतिम मुदत ९ जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे.
दुसऱ्या विशेष प्रवेश फेरीसाठी १० जुलै रोजी सकाळी १० वाजता रिक्त जागांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजल्यापासून ११ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत नवीन विद्यार्थ्यांना नोंदणी, अर्जातील दुरुस्ती तसेच किमान एक आणि कमाल दहा कनिष्ठ महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरण्याची संधी उपलब्ध असेल. १२ जुलै रोजी जागावाटप प्रक्रिया पार पडणार असून १३ जुलै रोजी सकाळी १० वाजता प्रवेश वाटपाची यादी जाहीर केली जाईल. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना १३ जुलै सकाळी ११ ते १४ जुलै सायंकाळी ६ वाजेपर्यंत संबंधित महाविद्यालयात प्रवेश निश्चित करता येईल. त्यानंतर १४ जुलै रोजी पुढील विशेष प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, मुलींसाठी स्वतंत्र विशेष प्रवेश फेरीचेही आयोजन करण्यात आले आहे. या फेरीअंतर्गत १० आणि ११ जुलै रोजी नव्याने अर्ज करणाऱ्या किंवा अर्जामध्ये दुरुस्ती करू इच्छिणाऱ्या विद्यार्थिनींना अर्ज नोंदणी, भाग-१ मधील दुरुस्ती, पसंतीक्रम भरणे आणि अर्ज लॉक करण्याची सुविधा उपलब्ध राहील. या फेरीसाठी १२ जुलै रोजी जागावाटप होणार असून १३ जुलै रोजी महाविद्यालय वाटपाची यादी आणि कट-ऑफ जाहीर करण्यात येणार आहे.







